प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न अनेकांनी उराशी बाळगलेले असते, परंतु सगळ्यांनाच हे स्वप्न पुर्ण करता येतेच असे नाही. कित्येकजण घरची परिस्थिती बेताची म्हणून हा मार्गच सोडून हाताला मिळेल त्या कामात धन्यता मानतात, मात्र असेही काही जण असतात जे त्यांच्या परिस्थितीची जराही पर्वा न करता त्या परिस्थितीला झुगारत सगळ्यांसमोर एक वेगळाच आदर्श बनून जातात. संगमनेर येथील संजय गांधी नगर मध्ये राहणाऱ्या संगीता अहिरे यांची कन्या कल्याणी अहिरे हिने सुद्धा परिस्थिती गरीबीची आहे म्हणून न थांबता मोठ्या जिद्दीतून, परिश्रमातून कल्याणी ने एमपीएससी परीक्षेतून सहाय्यक अभियंता वर्ग एकची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिच्या या यशाचे सगळीकडून कौतुक करण्यात येत आहे.
संगमनेरच्या रहिवासी संगीता अहिरे यांनी धुणी – भांडी करून कल्याणीला सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण दिले. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरीही त्यावर मात करत मोठ्या जिद्दीने कल्याणीने एमपीएससी परीक्षेतून सहाय्यक अभियंता वर्ग एकची परीक्षा उत्तीर्ण करत क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण केले आहे. या यशाबद्दल काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी कल्याणीचे कौतुक केले असून नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे यांनी तिचा सत्कार केला आहे.
हे सुद्धा वाचा…
Terrorism: पुण्यात एटीएसने एका दहशवाद्याच्या मुसक्या आवळल्या
Maharashtra Monsoon Session 2022 : आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांना बनवला ‘कुस्तीचा आखाडा’
इंदिरानगर प्रभा निवासस्थानी कल्याणी अहिरे व तिची आई श्रीमती संगीता अहिरे यांना सन्मानाने बोलावून दुर्गा तांबे यांनी कल्याणीच्या कामगिरीचे कौतुक करत तिला पेढे भरून तिचा सन्मान केला. याप्रसंगी धनंजय भाऊ डाके, नितीन अभंग, किशोर टोकसे, हिरालाल पगडाल, सौदामिनी कानोरे प्रा. जगताप सर आदी उपस्थित होते. कल्याणीच्या या यशाबद्दल माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉक्टर एम ए वेंकटेश. सिविल विभागाचे प्रमुख प्रा मधुकर वाकचौरे, प्रा शैलेश मेहेत्रे आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
कल्याणीचे कौतुक करताना दुर्गा तांबे म्हणाल्या की, कष्ट आणि जिद्द असेल तर माणूस यशस्वी होतो. गरीबीचे कारण हे अपयशामागे लपण्याचे कारण दाखवले जाते. मात्र कल्याणीने गरिबीवर मात करून मोठ्या जिद्दीने क्लासवन अधिकारी पद मिळवली आहे. हे आपल्या सर्व संगमनेरकरांसाठी आणि अमृतवाहिनी संस्थेसाठी भूषणावह आहे. कल्याणीने अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल अभियंता ही पदवी घेतली आहे. तिने या सर्व काळात अत्यंत जिद्दीने शिक्षण पूर्ण करताना उच्च ध्येय ठेवले आणि आज तिचे ध्येय पूर्ण झाले आहे हे तिच्यासह आपल्या सर्वांसाठी आनंददायी आहे असे म्हणून तांबे यांनी आनंद व्यक्त केला.
त्यावेळी या कौतुकाने भारावून गेलेली कल्याणी म्हणाली, मी ज्या वेळेस अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते त्यावेळेस तेथे येणारे क्लासवन अधिकारी त्यांचे राहणीमान व त्यांचा रुबाब पाहून मनात क्लास वन अधिकारी होण्याची ध्येय बाळगले. रात्रंदिवस अभ्यास केला, यासाठी मला माझे माध्यमिक विद्यालय, प्राथमिक विद्यालय, अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज यांसह विविध शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, हे सांगताना आपल्या जीवनामध्ये आपल्या आईचा मोलाचा वाटा असल्याचे सुद्धा कल्याणीने सांगितले.