लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : घोडबाजार रोखला पाहिजे, लोकशाहीची मूल्ये जपली पाहिजेत असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले आहे. त्यासाठी उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. परंतु बहुमत जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आता मर्जीतील हंगामी विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती केली जाईल, तसेच अजित पवार यांच्यामार्फत व्हिप जारी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मतापासून लांब ठेवले जाईल अशी खेळी भाजपकडून खेळी जाऊ शकते असे बोलेले जात आहे.
हंगामी विधानसभा अध्यक्षांसाठी विधीमंडळ सचिवालयाकडून काही नावे राज्यपालांकडे पाठविण्यात आली आहेत. त्यात मावळते अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यपालांकडून बागडे किंवा अन्य कोणत्याही भाजपच्याच मर्जीतील विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल असे बोलले जात आहे.
हंगामी अध्यक्षांकडून अजित पवारांना झुकते माप मिळण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे विधीमंडळ पक्षनेते कोण असा पेच आता निर्माण झालेला आहे. अजित पवारांनी आपण स्वतः विधीमंडळ पक्षनेता असल्याचा दावा केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांची या पदावरून हकालपट्टी केली आहे. त्या ठिकाणी जयंत पाटील यांची नियुक्ती केली आहे. परंतु हंगामी विधानसभा अध्यक्षांच्या खांद्यावर बंदुक ठेवून अजित पवार हेच खरे पक्ष नेते असतील असे प्रयत्न केले जातील. विधानसभा अध्यक्ष अजित पवारांना झुकते माप देतील, व जयंत पाटील यांचे पक्षनेते पद अवैध ठरवतील असे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचा खटाटोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान ५४ आमदार आहेत. त्यापैकी जवळपास ५१ आमदार शरद पवारांकडे आहेत. तीन आमदार अजित पवारांकडे असतील अशी शक्यता आहे. या सगळ्या ५४ आमदारांनी कुठे मतदान करावे याबाबत जयंत पाटील व अजित पवार अशा दोघांकडूनही व्हीप जारी केला जाईल. जयंत पाटील यांच्याकडून साहजिकच सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा व्हीप असेल, तर अजित पवारांकडून सरकारच्या बाजूने मतदान करा, किंवा मतदानाला गैरहजर राहा असा व्हीप काढला जाऊ शकेल. विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार यांचे पक्षनेते पद वैध ठरविल्यास सगळ्या आमदारांना अजितदादांचा आदेश मानावा लागेल. पण शरद पवार यांच्या सुचनेनुसार किमान ५० आमदार अजितदादांचा आदेश माणनार नाहीत, त्या ऐवजी सरकारच्या विरोधात मतदान करतील. पण अजितदादांचा आदेश मानला नाही, तर राष्ट्रवादीच्या ५० आमदारांचे सदस्यत्व रद्द होऊ शकेल. असे झाले तर लोकशाहीतील आणखी एक शोकांतिका पाहायला मिळेल.
कोणत्याही थराला जाण्याची भाजपची तयारी
राज्यपाल हा संविधानाला उत्तरदायित्व असतो. परंतु विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपला उत्तरदायित्व आहेत अशा पद्धतीने वागत असल्याचे दिसत आहे. कोश्यारी यांनी आतापर्यंत घेतलेले सगळे निर्णय भाजपलाच झुकते माप देणारे आहेत. राज्यपाल पदाचा दुरूपयोग करून भाजप आपल्याला हवे तसे निर्णय घेत आहे. आता राज्यपालांचा वापर करून भाजप मर्जीतील विधानसभाध्यक्षांची नियुक्ती करवून घेतली जाईल. भाजप विधानसभा अध्यक्षांमार्फत अजितदादांचे अनैतिक पक्षनेतेपद वैध करवून घेईल. आपलेच सरकार बनवायचे किंवा विरोधकांना सरकार स्थापन करू द्यायचेच नाही, यासाठी भारतीय जनता पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यासाठी भारतीय राज्य घटना, लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवून नितिमत्ता खुंटीला टांगणी तरी त्यात नवल वाटणार नाही.
हे सुद्धा वाचा
महाविकास आघाडी 30 तासात नव्हे, 30 मिनिटांत बहुमत दाखवू शकते
मोठी बातमी : उद्या बहुमत सिद्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, घोडेबाजार रोखण्यासाठी निकाल
राष्ट्रवादीच्या पक्षनेत्यांचा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेतील : विधीमंडळ सचिव
‘राज्यपालांनी संविधानाचा खेळखंडोबा केला, संविधानाच्या बारा वाजवल्या’