टीम लय भारी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. गेल्या महिन्यातही त्यांनी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा हा सपाटा आणखी काही दिवस असाच सुरू राहणार आहे. प्रशासनामधील अंदाजे ६० आयएएस अधिकारी ठाकरे यांच्या रडारवर आहेत. या अधिकाऱ्यांना ‘योग्य जागे’वर पाठविण्याची तयारी ठाकरे यांनी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आतापर्यंत अंदाजे ३० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. उरलेल्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या यथावकाश होतील असे या सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात खास मर्जीतील आयएएस अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदांवर नेमले होते. या अधिकाऱ्यांना हाताशी धरून फडणवीस आपला कारभार चालवत होते. विशेष म्हणजे, आपल्याच मंत्र्यांना फडणवीस फार कामे करून देत नव्हते. प्रत्येक मंत्र्यांच्या खात्याचा कारभार त्या खात्याच्या सचिवांमार्फत फडणवीसच चालवायचे. राज्यभरातील जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, आयुक्त, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी अशा महत्वाच्या पदांवर फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची सोय लावून दिली होती. अशा सगळ्या अधिकाऱ्यांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचलेली आहे. यातील अती ‘फडणवीसप्रेमी’ अधिकाऱ्यांची काळजी ठाकरे घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
‘फडणवीसप्रेमी’ सनदी अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी ‘योग्य जागा दाखवावी’ अशी दुर्दम्य इच्छा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तसेच प्रशासनातील बहुजनवादी अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे अनेकांची ही इच्छा फलद्रुप होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर आता पुढील बदल्या केव्हा होणार याची उत्सुकता अधिकारी वर्तुळाला लागली आहे.
हे सुद्धा वाचा
मुख्यमंत्र्यानी केल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
वाडियाचा वाद सोडविण्यात अजितदादा, राजेश टोपे यांचेही योगदान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उभारणी धनंजय मुंडेच्या निगराणीखाली होणार