टीम लय भारी
मुंबई : नव्या मंत्र्यांना भेटण्यासाठी सामान्य लोकांचे लोंढे मंत्रालयात येत आहेत. जवळपास प्रत्येक मंत्र्यांकडेच त्यामुळे मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पण सर्वाधिक गर्दी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनाबाहेर दिसत आहे.
अजितदादा मंत्रालयात आले की, त्यांच्या दालनाबाहेर मोठी गर्दी झालीच म्हणून समजा. त्यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या व्हरांड्यात सुद्धा पाय ठेवायला जागा मिळत नाही, इतकी गर्दी अजितदादांना भेटण्यासाठी होत आहे. अजितदादांचा लोकसंग्रह मोठा आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांशीही ते आपुलकीने वागत असतात. ते सडेतोड आहेत. पण कार्यकर्त्यांना जपण्याचेही काम ते करतात. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदावर आल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे. अनेकजण आपली कामे घेऊनही अजितदादांकडे येत आहेत. कामे घेऊन आलेल्या आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या लोकांमुळे गर्दी होत आहे.
अजितदादांप्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दालनाबाहेर सुद्धा मोठी गर्दी दिसत आहे.
नव्या मंत्र्यांना भेटण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे गर्दीत वाढ झाली आहे. मंत्रालयात जाण्यासाठी आतापर्यंत तीन प्रवेशद्वारांचा वापर केला जात होता. त्यापैकी दोन प्रवेशद्वार सामान्य लोकांसाठी बंद केली आहेत. ‘गार्डन गेट’ या एकाच प्रवेशद्वारातून लोकांना आत सोडले जाते. त्यामुळे या एकमेव प्रवेशद्वारावर मोठी गर्दी होत आहे. आणखी एखादे तरी प्रवेशद्वार सामान्य लोकांसाठी खुले करायला हवे अशी भावना गर्दीतील लोकांमधून व्यक्त केली जात आहे.
मंत्रालयात येणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी ती फार दिवस टिकणार नाही. मंत्र्यांचे नवेपण संपले की, येणाऱ्यांची संख्याही आपोआप कमी होईल. महिनाभरात रांगा व मंत्री कार्यालयातील गर्दी कमी झालेली पाहायला मिळेल, अशी प्रतिक्रिया मंत्रालयातील सूत्रांनी व्यक्त केली.
हे सुद्धा वाचा
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये विरोधकांचे फोन टॅप; ठाकरे सरकारकडून चौकशीचे आदेश
आदित्य ठाकरे जे बोलले, ते त्यांनी करून दाखवले