38 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeराजकीयभोंग्यातून अजान ऐकू आल्याने पंतप्रधान भाषण थांबवतात तेव्हा त्यांचे कौतुक होते, मग...

भोंग्यातून अजान ऐकू आल्याने पंतप्रधान भाषण थांबवतात तेव्हा त्यांचे कौतुक होते, मग आताच कीडा का वळवळू लागला ? राष्ट्रवादीचा भाजपला बोचरा सवाल

टीम लय भारी :

मुंबई  : सध्या महाराष्ट्रातील राजकारण ‘अजान आणि हनुमान चालिसा’ या मुद्द्यांभोवती फिरते आहे. उत्तर प्रदेशात पंतप्रधानाचे भाषण सुरु असताना अजानाची वेळ झाली अजानचा आवाज कानावर येताच पंतप्रधानांनी भाषण थांबविले याचे सर्वत्र कौतुक झाले, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर प्रामुख्याने दाखविले गेले.  भोंग्यातून अजान ऐकू आल्याने पंतप्रधान भाषण थांबवतात तेव्हा त्यांचे कौतुक होते, मग आता अचानक त्याच भोंग्याच्या आवाजाचा किडा वळवळून कसा बाहेर आला, असा बोचरा सवाल माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी भाजपला केला आहे. (Anil Gote criticizes BJP over Hanuman Chalisa)

 

धर्माच्या नावावर धार्मिक भावना भडकविणाऱ्यांची मुले, कुटूंबिय सुरक्षित राहून गोरगरीबांचे मुडदे पडले पाहिजेत. त्यांच्या प्रेतावर आपल्या राजकिय पोळ्या भाजून घेता येतील. मस्जिदीसमोर आम्ही हनुमान चालीसा म्हणू!” हनुमान चालीसाच का ? रामरक्षा का नको? भाजपचा उद्देश एवढाच की, देशभरातील धार्मिक वातावरण गढूळ झाले पाहिजे. जातीय दंगे झाले पाहिजेत. एवढा एककलमी कार्यक्रम जीवाच्या आकांताने भाजपाचे नेते राबवित आहेत. असा विरोधी पक्षही यापूर्वी कधी पाहिला नव्हता, असे अनिल गोटे म्हणाले.

‘भाजपचे नेते वृत्तवाहिन्यांसमोर तुणतुणे वाजवत असतात’

भाजपाचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री  देवेन्द्र फडणवीस, पक्षाचे अध्यक्ष  चंद्रकांत पाटील व त्यांच्या टोळीतील सदस्य दूरदर्शनवर येऊन प्रत्येक वेळी गेल्या सत्तर वर्षात “महाराष्ट्रात असे घडले नाही” असे तुणतुणे वाजवत असतात. त्याच वेळेला महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असा विचार येतो की, सरकारमधील नेत्यांच्या मागे केन्द्रीय तपास यंत्रणा, ई.डी., इन्कमटॅक्स, सि. बी. आय. लावून त्यांना अकारण हैराण करणे असे उद्योग करणारा विरोधक पक्ष महाराष्ट्राने यापूर्वी कधी पाहिलेला नाही. आपण केलेल्या कारस्थानाला सत्तारुढ पक्ष दबत नाहीत, बळी पडत नाही म्हणून जातीयवाद भडकविणे, नसलेला धार्मिक तणाव निर्माण करणे हा भाजपचा उद्देश असल्याचे अनिल गोटे यांनी सांगितले.

‘सुपाऱ्या देऊन महाराष्ट्रातील शांतता धोक्यात आली आहे’

राज्यातील हिंदू-मुस्लीमांमध्ये असलेले सलोख्याचे वातावरण बिघडविण्याच्या दृष्टीने हेतूतः धार्मिक तेढ ओ वातावरण निर्माण होईल असे निर्माण करणे यासाठी व्यावसायिक राजकारण्यांना खरेदी करुन किंवा त्यांना सुपाऱ्या देऊन महाराष्ट्रातील शांतता धोक्यात आली आहे, असे उद्योगही यापूर्वी राज्यातील जनतेने कधी पाहिले नाहीत. वस्तुतः मस्जिदवरील भोंग्याचा प्रश्न हा एकट्या महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, या प्रश्नाची व्याप्ती पूर्ण देशभर आहे. मस्जिदीवरील भोंग्यातून “अजान” सुरु होताच हिंदूत्ववादाचे कट्टर समर्थक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही “अजान” संपेपर्यंत आपले दहा मिनीटे भाषण थांबविले. याचे मार्केटिंग करायलाही हेच नेते आघाडीवर होते, असे अनिल गोटे म्हणाले.

 

 

‘केंद्र सरकारच्या पुरस्काराने महाराष्ट्रात पोकळ धमक्या दिल्या जात आहेत’

राज्याच्या मुख्यमंत्र्यानी काल सडेतोड भूमिका घेऊन “तुम्ही दादागिरी करणार असाल तर त्याच मार्गाने उत्तर द्यावे लागेल” अशी कणखर भूमिका घेतली. उटसूट राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या देणे, विरोधी पक्षाने केलेल्या कारस्थानाविरोधी सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यानी भूमिका घेताच, आम्हीही रस्त्यावर उतरु असल्या पोकळ धमक्या देणे हा कार्यक्रम सध्या महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या पुरस्काराने सुरु आहे. दिवसागणिक वाढत असलेले पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाण्याचे तेल याचे गगनाला भिडणारे भाव, बेरोजगारी, आजही भारताच्या सिमेवरील हुतात्म्यांचे आकडे कमी होत नाहीत. भारतमातेचे सुपूत्र पाकिस्तांकडून होणाऱ्या कुरापतीत हौतात्म्य पत्करीत आहेत. आपल्याच देशातील सलोख्याच्या आणि शांततेच्या वातावरणाला सत्तारुढ सुरुंग लावत आहे. असाही विरोधी पक्ष देशातल्या जनतेने यापूर्वी पाहिलेला नाही. तुम्ही जशी क्रिया कराल, तशीच प्रतिक्रिया जर कोणी व्यक्त केली तर त्यांच्या नावाने नकाश्रु ढाळणे म्हणजे अरण्यऋदन होय,असे अनिल गोटे म्हणाले.

‘… तेव्हा देवेन्द्र फडणवीसांचा जीभ कापलेला पोपट झाला होता’

देवेन्द्र फडणवीसांनी तर रंग बदलण्याच्या सरड्याचाही पराभव केला. एस. टी. आंदोलकांच्या प्रश्नांचा उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एखादा मनोविकृतच वागू शकेल असे कृत्य सिल्वर ओकवर करायला लावले. देवेन्द्र फडणवीसांची लगेच वृत्त वाहिन्यांना मुलाखत “कुठल्याही नेत्याच्या घरापर्यंत जाणे योग्य नाही.” साळसूदपणा करुन आपले काही देणे-घेणे नाही असे दर्शविण्याचा प्रयत्न केला, पण त्याचवेळी रवी राणा व त्यांच्या पत्नी  नवनीत राणा यानी हनुमान चालीसा वाचण्यासाठी “आपण मातोश्रीवर जाणार” अशी घोषणा केली. त्यावर  रवी राणा दाम्पत्यास पोलीसांनी ताब्यात घेण्यापर्यंत देवेन्द्र फडणवीसांचा जीभ कापलेला पोपट झाला होता. राणा दाम्पतयास अटक होताच देवेन्द्र फडणवीस पुन्हा बोलते झाले, पण “मातोश्रीवर जावू नका ” असा सल्लाही राणा दाम्पत्याला काही दिला नाही. वातावरण चांगले तापू दिले. सरकारने कठोर निर्णय घेताच “माझा नवीन पोपट हा लागला गुलूगुलू बोलायला” राज्यातील जनता एवढी काही दूधखूळी नाही की, या सर्व गोंधळामागे सूत्रधार कोण आहे हे समजू शकत नाही, असे अनिल गोटे म्हणाले.(Anil Gote criticizes BJP over Hanuman Chalisa)

 

‘समान नागरी कायद्याचे” कारण हा पुढच्या निवडणुकीचा मुद्दा असेल हे निश्चित’

महाराष्ट्रात दंगली घडविण्याची सुपारी घेतलेले जसे अनेक नेते आहेत. त्यातीलच एक राणा दाम्पत्य ! काही कारण नसताना छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचा वाद उपस्थित करुन अमरावतीतील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणून अशांतता निर्माण करण्याचे पध्दतशील प्रयत्न केले. त्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार व अन्य नेत्यांना पोलीस अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्तांना अर्वाच्य शिव्यांची वाखोली वाहिण्याचे काम राणा दाम्पत्याने केले. हिंदूहृदय सम्राट स्वर्गिय बाळासाहेबांचे निवासस्थान म्हणजे सैनिकांचे श्रध्दास्थळ मातोश्री जवळ जावून हनुमान चालीसा वाचण्याचे प्रयोजन काय ? याचा खुलासा राणा दाम्पत्याने केला नाही त्यांना पुरस्कृत करण्याचा भाजपानेही केलेला नाही. भाजपाला सार्वत्रिक निवडणूकीपूर्वी गेल्या पाच वर्षात महागाई, बेरोजगारी, मातलेली बेबंदशाही यासाठी केंद्रसरकारने काय केले? यावर कुठलेही उत्तर नसल्याने आता “समान नागरी कायद्याचे” कारण हा पुढच्या निवडणुकीचा मुद्दा असेल हे निश्चित, असे अनिल गोटे म्हणाले.

‘दलीत, ओबीसी इत्यादींचे आरक्षणाचे  मार्ग संपुष्टात आणण्याचे भाजपचे कुटील कारस्थान’

पेशवे कुटूंबातील महिला भाजपाची भूमिका नेहमीच जे करायचे आहे, ते बोलायचे नाही. पेशवे काळात “तिकडून” सांगणे झाले असे म्हणत. तीच पेशवाई भाजपावाले वापरत आहे. राज ठाकरेनी समान नागरी कायद्याची मागणी केली. याचा अर्थ असा की, “तिकडून” सांगणे झाले असे म्हणायला भाजपावाले मोकळे! मुस्लीमांच्या बहु पत्नीत्वाच्या कायद्याचे अस्तित्व नष्ट करण्याकरिता समान नागरी कायदा आणणार हे केवळ निमित्तासाठी असेल पण समान नागरी कायदा आणून दलीत, आदिवासी, ओबीसी इत्यादींचे आरक्षणाचे सर्व मार्ग संपुष्टात आणण्याचे हे कुटील कारस्थान या मागे आहे हे निश्चित ! खरे तर, देशातील मागासवर्गीयांनी जागे होण्याची हिच वेळ आहे. मांजर डोळे मिटून दूध पिताना अशा गैरसमजात असते की, आपल्याप्रमाणे समोरच्यानेही डोळे मिटलेले आहे. पाठीत बडगा बसल्याशिवाय मांजराला कळत नाही की, मालकाचे लक्ष आपल्याकडे होते, असे सडेतोड पत्रक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी प्रसिध्दीस दिले आहे. (Anil Gote criticizes BJP over Hanuman Chalisa)

 

 


हे सुद्धा वाचा : 

हिंदुत्वनिष्ठ असल्याचे सिद्ध करण्यासाठी भाजपाच्या हायब्रीड हिंदुत्ववाद्यांची केविलवाणी धडपड : अनिल गोटे

Politics : सत्ता गेल्यामुळेच भाजपच्या नेत्यांनी ताळतंत्र सोडलेय, शरद पवार यांची इच्छा असेल तरच सरकार पडेल : अनिल गोटे

गोपीचंद पडळकर – शरद पवार वादाच्या पार्श्वभूमीवर अनिल गोटेंचे भाजपवर खळबळजनक आरोप

भाजप सत्तेसाठी महेबुबा मुफ्ती बरोबर गेले,उद्या तालीबान्यांबरोबर युती केली तरी आश्चर्य नाही : अनिल गोटे

BJP took donations from Mumbai blast accused Iqbal Memon’s firm: Anil Gote

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी