31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईलब्यू उद्धवजी, मराठी अभिनेत्याचे उद्धव ठाकरे यांना पत्र

लब्यू उद्धवजी, मराठी अभिनेत्याचे उद्धव ठाकरे यांना पत्र

लय भारी टीम

मुंबई : शिवसेना नेत्यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. काही कळायच्या आत अवघ्या नऊ दिवसांच्या आत मविआ सरकार कोसळले, त्यामुळे राज्यातील जनता प्रचंड नाराज झाली. आपल्या बोलण्याने सहज आपलेसे करणारे उद्धव ठाकरे आता यापुढे मुख्यमंत्री नाहीत या विचाराने अनेकजण दुःखी झाले. यावर मराठी अभिनेता किरण माने यांनी सुद्धा फेसबुकवर पोस्ट करून उद्धवजी, एकच शब्द : ‘ग्रेसफुल’! असे लिहून आपले मत मांडले आहे.

फेसबुक पोस्टमध्ये किरण माने लिहितात, …कुणाचा विश्वास बसणार नाही, पण तुम्ही राजीनामा दिलात हे कळल्यावर जिथे मी होतो त्या घरातला एकेक मानूस हळहळला. च् च् च् च् असे आवाज आले. काहीजणांच्या डोळ्यांत पाणी आलेलं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. घरातल्या तरुण लोकांपासून म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य होतं ‘चांगला मानूस व्हता’!

“उद्धवजी, खरं सांगू? मला लै आनंद झाला. का ते नंतर सांगतो.. पन तुमच्या आयुष्यात जे घडलं, ते नविन नाय. राजकारनात तर ‘काॅमन’ गोष्ट हाय. खर्‍या आयुष्यात गरीब असो वा श्रीमंत… सामान्य मानूस असो वा सेलिब्रिटी..त्याच्या त्याच्या पातळीवर पराभवाचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. विश्वासघाताचं दु:खबी सगळ्यांना पचवावं लागतं. पन अशावेळी लै कमी लोक तुमच्यासारखे ‘धीरोदात्त’ असतात ! मी म्हनत नाय की तुमची चूक नसंलच. तुमच्याकडुन चुका झाल्याबी असतील. पन तरीबी जे घडलं ते ‘मानूस’ म्हनून उद्ध्वस्त करनारं होतं. तुम्ही आतनं ‘तुटला’ नसाल का हो? काळजाला घरं पडली नसतील का?? जी मान्सं तुमच्या पक्षानं शून्यातनं वर आनली.. त्या मान्सांबरोबरचे सुरूवातीपासूनचे कित्येक आनंदा-दु:खाचे क्षण तुमच्या डोळ्यांसमोर तरळले नसतील का???” असे ग्रामिण ठसक्यात माने यांनी ठाकरे यांना न राहवून विचारले आहे.

पुढे माने लिहितात, “ज्या संयमानं, उद्वेग-चिडचिड न करता, तारस्वरात न किंचाळता, शांतपने पद सोडलंत, ती वृत्ती ‘आजकाल’ लै दूरापास्त झालीय. मला आनंद याचा झालाय की तुमी आता लै लै लै भाग्यवान आहात. सहजासहजी कुनाला मिळनार नाय, आज एकाबी नेत्याकडं नसंल अशी एक गोष्ट तुमच्याकडं हाय… कुठली? आता तुमच्याजवळ जे उरलेत ते अत्यंत नि:स्वार्थी, निष्ठावान, शुद्ध – स्वच्छ मनाचे कार्यकर्ते आहेत. भले संख्या कमी असेल, पन जे आहेत ते मनाच्या तळापास्नं ‘तुमचे’ आहेत.”

“जितक्या नि:स्वार्थीपने तुमच्यासोबत रश्मीजी आणि आदित्य आहेत, तितक्याच नितळ भावनेनं आता उरलेले सगळे शिवसैनिकबी तुमचे आहेत. गाळ बाजूला गेला, आता शंभर टक्के ‘प्यूअर’ असलेला एकेक माणूस तुमच्यासोबत आहे. नशीबवान आहात! तुम्हाला राखेतनं झेप घ्यायचीय.. शून्यातनं विश्व उभं करायचंय.. हे लिहीनारा मी ना शिवसैनिक, ना राजकारनी. तुमी आयुष्यात कुठली मदतबी मला केलेली नाय आनि मी ती अपेक्षा बी कधी ठेवली नाय. तरीबी मला तुमच्याबद्दल आज हे वाटतंय, ही तुमची ‘ॲचिव्हमेन्ट’ आहे!”

शेवटी लब्यू उद्धवजी असे म्हणत किरण माने यांनी पत्राचा शेवट केला आहे. माने यांच्याप्रमाणे अनेक लोक उद्धव ठाकरे यांच्या शैलीमुळे, राज्यकारभार, विकासाच्या नव्या व्याख्येमुळे किंबहुना त्यांच्या जनतेबाबत असलेल्या आपलेपणामुळे खूप कमी वेळात ते लोकांच्या मनामनात पोहोचले त्यामुळे सरकार सांभाळण्यात अपयश आले असले तरीही राज्यातील जनतेला जिंकून घेण्यात मात्र त्यांना यश आले आहे.

हे सुद्धा वाचा : 

एकनाथ शिंदे म्हणाले; सर्वांना वाटले होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, पण…

शिवाजीराव आढळराव – पाटील हे शिवसेनेतच, त्यांची हकालपट्टी नाही!

जयंत पाटील यांनी राज्यपालांना ‘गोंजारत‘ चिमटे काढले!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी