टीम लय भारी
कोल्हापुर : राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात दररोज विविध मुद्द्यावरून आरोप, प्रत्यारोप, शाब्दीक युध्द असा जोरदार सामना सुरु आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावातील निवडणूक सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या खानापूर गावात शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकर यांना रोखण्यासाठी तीन पक्षांनी व्यूहनीती आखली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपली. त्यामुळे आता प्रत्येक गावातील चित्र स्पष्ट झाले आहे. गावोगावी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. निवडून येण्यासाठी विविध समीकरणे जूळवली जात आहेत. तर दुसरीकडे चंद्रकात पाटील यांच्या खानापूर गावात भाजपने सेनेला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरुद्ध शिवसेना असं चित्र असताना खानापूरात मात्र अगदी वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.
स्थानिक निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या आघाड्या पाहायला मिळतात. या आघाड्यांची समीकरणे विधानसभा, लोकसभा निवडणुकीपेक्षा वेगळी असतात. आमदार, खासदार स्थानिक निवडणुकांमध्ये फारसं लक्ष घालत नाहीत. पक्षाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतील नेत्यांकडे स्थानिक निवडणुकांची जबाबदारी असते. अशा निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचे राजकारण जास्त महत्वाचे ठरते.