केरळ येथील कोझिकोड जिल्ह्यात एका अज्ञात व्यक्तीने सहप्रवाशाच्या अंगावर पेट्रोल टाकून चालत्या ट्रेनमध्येच पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यात एका माय-लेकाचा समावेश आहे. एलाथुर येथील रेल्वे रुळांजवळ दोन मृतदेह सापडले असून या घटनेत आठ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, आठपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अलप्पुझा-कन्नूर मुख्य कार्यकारी एक्स्प्रेसच्या डी1 डब्ब्यात रात्री 10च्या सुमारास ही घटना घडली आहे.
ट्रेन कोढीकोड शहरातून निघाल्यानंतर कोरापुझा रेल्वेपुलाजवळ पोहोचल्यानंतर प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधला व घडलेली घटना सांगितले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. प्रवाशांना आपतकालीन साखळी खेचून ट्रेन थांबवली. मात्र, त्याचवेळी ट्रेनचा वेग कमी झाल्याचे पाहून आरोपीने ट्रेनमधून पळ काढला. नंतर आरपीएफने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यात आली. तर जखमींना रुग्णालात दाखल केले. काही प्रवाशांनी तीन जण बेपत्ता असल्याचं सांगितले. त्यानंतर शहर पोलिसांनी रुळांची पाहणी केली असता तिथे मृतदेह पडलेले सापडले. एक महिला व लहान मुलांचा मृतदेह असून एका अज्ञात पुरुषाचा मृतदेहही पोलिसांना सापडला. मुलाचे वय एक वर्ष असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तर, आग लागल्याचे पाहून त्यांनी ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असावा किंवा कोणीतरी त्यांना ढकलून दिले असावे, असा पोलिसांना संशय आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये चढण्यावरुन दोन व्यक्तींमध्ये भांडण झालं होतं. बसायला सीट मिळाली नाही म्हणून आरोपीचं महिलेसोबत वाद झाला होता. यावेळी महिलेच्या बाजूने काही प्रवाशांनीही आरोपीसोबत वाद घातला. यामुळं संतापलेल्या आरोपीने महिलेच्या अंगावर पेट्रोल शिंपडून आग लावली. ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, लाल शर्ट घातलेल्या व्यक्तीने महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकले व नंतर माचिसने पेटवून दिलं. त्यामुळं संपूर्ण ट्रेनचा डब्ब्यात आग लागली. यात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. आरोपीची अद्याप ओळख पटलेली नसून सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली आहे.
हे सुद्धा वाचा :
नवी मुंबई महापालिकेत कोट्यवधींचा घोटाळा
30 कोटींची संपत्ती असणाऱ्या IASच्या आजी-आजोबांनी जीवन संपवलं!
सलमान खाननंतर आता संजय राऊतांना लॅारेन्स बिश्नोई गॅंगकडून जीवे मारण्याची धमकी