बॉलिवूडचा दबंग सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. सलमानविरोधात अंधेरी दंडाधिकारी कोर्टात सुरू केलेली कारवाई रद्द करण्याचे निर्देश हायकोर्टानं जारी केलेत. सलमान खाननं आपल्या बॉडीगार्डसह हल्ला केल्याची तक्रार कथित पत्रकार अशोक पांडेनं डी.एन. नगर पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र पोलिसांनी तक्रार न घेतल्यानं पांडेनं अंधेरी दंडाधिकारी कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.
अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टानं साल 2019 मध्ये एका पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी सलमान खानला समन्स जारी करत त्याचा अंगरक्षक नवाज शेखसह कोर्टासमोर हजर राहण्याचे निर्देश दिलेले होते. याच प्रकरणात हजेरीसाठी सलमान खानला समन्स पाठवलं होतं. त्यामुळे हे समन्स आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रीया रद्द करण्याची मागणी केली होती. सलमानच्या या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली.
काय आहे प्रकरण?
एके दिवशी मुंबईत रस्त्यावर सायकल चालवत असताना काहीजणांनी सलमानचे फोटो क्लिक घेण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान सलमानच्या बॉडीगार्डनं त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर सलमानच्या बॉडीगार्डनं वाद घालत धमकी दिल्याचा आरोप पत्रकार अशोक पांडे यांनी केला होता. पांडे यांनी याबाबत सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकाविरोधात भांदवि कलम 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि 506 (धमकावणे), 323 (एखाद्याला इजा करणे), 392 (दरोडा), 506 (गुन्हेरगारी प्रवृत्ती), 34 (एकापेक्षा अधिक व्यक्तींचा समान हेतू) या कलमांतर्गत डी.एन. नगर पोलीस स्थानकांत तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर महानगर दंडाधिकारी आर. आर. खान यांच्यासमोर सुनावणी पार पडली असता रेकॉर्डवरील सामग्री, पोलिसांचा सकारात्मक अहवाल आणि इतर पुरावे लक्षात घेऊन, आरोपींविरोधात कारवाई करण्यासाठी पुरेसे कारण असल्याचं स्पष्ट करत अंधेरी कोर्टानं आरोपींना समन्स जारी केलेलं होतं.
हे सुद्धा वाचा :
बॉलीवूडचा भाईजानला जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड
‘बजरंगी भाईजान’चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सलमान खानने दिले संकेत