टीम लय भारी
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दोन नंबरची जागा आनंदाने स्विकारलेली दिसत नाही. त्यांचा चेहरा नाखूष दिसत होता. परंतु ते स्वयंसेवक आहेत. आलेला आदेश त्यांनी पाळला असावे, असे निरीक्षण शरद पवार यांनी नोंदविले आहे.
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतली. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले की, फडणवीस यांनी यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे काम केले होते. सध्या विरोधी पक्षनेते होते. पण भाजपमधील कार्यपद्धतीनुसार नवी दिल्लीतून किंवा नागपूरहून आलेला आदेश तंतोतंत पाळायचा असतो.
यापूर्वी सुद्धा मी, शंकरराव चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्या बाबतीत मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या व्यक्तीच्या हाताखाली माजी मुख्यमंत्र्यांनी काम केल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी कनिष्ठ ठिकाणी काम केले यात आश्चर्य काही नाही.
परंतु आसाममध्ये एकनाथ शिंदे गेले होते. त्यावेळी त्यांची भाजपच्या नेत्यांशी बोलणी झाली असतील. त्यावेळी खुद्द एकनाथ शिंदेंनी सुद्धा उपमुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे पद मागितले नसावे. आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळणार आहे, खुद्द शिंदे यांनाही वाटले नसावे, असे पवार म्हणाले.
सातारचे पाच मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे हे ठाण्याचे प्रतिनिधित्व करतात. पण ते सातारचे आहेत. मी सुद्धा मुळचा सातारचा आहे. यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराच चव्हाण व बाबासाहेब भोसले असे एकूण पाचजण आतापर्यंत सातारचे मुख्यमंत्री झाले. त्या अर्थाने सातारला ही लॉटरीच लागली असे म्हणावे लागेल.
एकनाथ शिंदेना केला फोन…
मी एकनाथ शिंदे यांना फोन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यावेळी कोणतीही व्यक्ती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेते, त्यावेळी ती व्यक्ती संपूर्ण राज्याची होते. ते संपूर्ण राज्याच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, असा आशावादही पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदारांना बाहेर नेण्यात एकनाथ शिंदे ‘प्रभावी’ ठरले
‘महाविकास आघाडी सरकार’ वाचविण्यात आम्ही कमी पडलो नाही. मात्र एकनाथ शिंदे शिवसेनेच्या लोकांना बाहेर न्यायला प्रभावी ठरले. पक्षातील 38 – 40 आमदार बाहेर जातात, हे सोपे नाही. ते नेण्याची ‘कुवत’ शिंदे यांनी दाखविली. त्याची तयारी आधीच झाली होती. या गोष्टी एकाच दिवसात घडत नाहीत. आम्ही बंड मोडण्याचा प्रयत्न केला. पण 38 – 39 लोकं बाहेर जातात. त्यांची भाषा वेगळी होती. त्यामुळे काहीही करायला स्कोप राहिला नाही.
हे सुद्धा वाचा :
एकनाथ शिंदेंच्या मुख्यपंत्रीपदामुळे आनंदी चेहरे कमी, दुःखी चेहऱ्यांचीच संख्या जास्त
मुख्यमंत्री पदावर विराजमान होत असतांना चेहरा मात्र चोरा सारखा