33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeसंपादकीयMaharashtra Politics : ‘भाजपला मुंबई ‘ठाकरे’मुक्त, तर बारामती ‘पवार’मुक्त करायची आहे’

Maharashtra Politics : ‘भाजपला मुंबई ‘ठाकरे’मुक्त, तर बारामती ‘पवार’मुक्त करायची आहे’

‘भाजपला मुंबई ठाकरेमुक्त करायची आहे, तर बारामती पवारमुक्त करायची आहे’, असे विधान रोहित पवार यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पण ते सोपे नाही. लोकांची विचारसरणी भाजपला नीट माहीत नाही, अशी पुस्तीही रोहित पवार यांनी जोडलेली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका हाता तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने उद्धव ठाकरे यांना ‘टार्गेट’ केले आहे. एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून 40 आमदारांना आपल्याकडे खेचल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपने कंबर कसलेली आहे. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर केला जात आहे. दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्यामागे सुद्धा भाजपने ससेमिरा लावला आहे. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून अजित पवार यांच्या मागे चौकशा लावल्या होत्या. आता बारामती लोकसभा मतदारसंघांवर भाजप नेत्यांनी ‘लक्ष्य’ केंद्रीत केले आहे. सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या या नितीवर भाष्य केले आहे.

भाजपला मुंबई ‘ठाकरे’मुक्त करायची आहे, तर बारामती ‘पवार’मुक्त करायची आहे. पण ते सोपे नसल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलंच पाहीजे. येथे झालेला विकास त्यांनी पाहावा, आणि त्यावरून विकासाचे राजकारण करावे असे आव्हानवजा आवतणं त्यांनी दिले आहे.

नुकतेच अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते. ठाकरे कुटुंबाच्या ताब्यातून मुंबई घ्या, असे विधान त्यांनी केले होते. ज्या वेळी अमित शाह मुंबईत होते. त्याच्याच दुसऱ्या दिवशी भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर गेले. लवकरच निर्मला सीतारामण बारामती दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी बावनकुळे बारामतीत पोहोचले. मुंबईत आल्यानंतर अमित शाह यांनी प्रमुख नेत्यांसोबत गुप्तगू केले होते. त्यानंतर ठाकरे व पवार यांच्या विरोधात भाजपचे नेते आणखी कणखरपणे कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांचे विधान महत्वाचे आहे.

भाजप नेत्यांनी मुंबईवर लक्ष केंद्रीत केले आहेच. पण आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीवर सुद्धा लक्ष केंद्रीत केले आहे. याच अनुषंगाने भाजपने वरळी येथील जांबोरी मैदानात पंधरवड्यापूर्वी दहिहंडीचे आयोजन केले होते.
वरळीमध्ये शिवसेना आमदार सचिन अहिर हे वर्षानुवर्षे दहिहंडीचे आयोजन करतात. परंतु यंदा भाजपने सत्तेचा वापर करीत वरळीमध्ये भलीमोठी दहिहंडी आयोजित केली होती.

हे सुद्धा वाचा…

Rohit Pawar : रोहित पवारांकडून भाजप नेत्यांना बारामतीचं आवतणं…

Maharashtra Politics : ‘बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच भाजप वाचला’

Ratnagiri News : माजी पंचायत समिती सभापती बेपत्ता झाल्याने एकच खळबळ

या मतदारसंघातून यापूर्वी शिवसेनेचे सुनील शिंदे हे आमदार म्हणून निवडून आले होते. सुनील शिंदे यांच्या या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी घेतली. त्यामुळे सुनील शिंदे यांचे राजकीय करिअर अडचणीत आले आहे. त्यामुळे सुनील शिंदे यांनी आता एकनाथ शिंदे गटात उडी मारली आहे. सुनील शिंदे यांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांचे राजकारण अडचणीत आणण्याचे भाजपचे मनसुबे स्पष्ट दिसत आहेत.

दुसऱ्या बाजूला भाजपच्या नेत्यांनी आता बारामतीवर ‘लक्ष्य’ केंद्रीत केले आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे, तसेच त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवार या दोन्ही भावंडांना चितपट करण्यासाठी भाजपचे नेते आसुसलेले आहेत. सुप्रिया सुळे व अजित पवार यांना अडचणीत आणले की, शरद पवार कुटुंबाचे राजकारणच धोक्यात येईल. निवडणूक काळात पवार कुटुंबाला बारामतीत मग्न केले की, अख्खा महाराष्ट्र भाजपला पादाक्रांत करता येईल, असा भाजपच्या नेत्यांचा होरा आहे.

या पार्श्वभूमीवर ‘भाजपला मुंबई ठाकरेमुक्त करायची आहे, तर बारामती पवारमुक्त करायची आहे’, असे विधान रोहित पवार यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पण ते सोपे नाही. लोकांची विचारसरणी भाजपला नीट माहीत नाही, अशी पुस्तीही रोहित पवार यांनी जोडलेली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी