दहावी, बारावी परीक्षेदरम्यान मोबाईल आणि अन्य माध्यमांतून होणाऱ्या पेपरफुटीचे सत्र कायमचे थांबविण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कंबर कसून तयारी केली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू होत असून या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी आठ भरारी पथके कार्यरत असतील. याच अनुषंगाने विद्यार्थ्याकडे परीक्षागृहात कॉपी आढळल्यास ती पुरविण्यासाठी पालक किंवा शिक्षक (पर्यवेक्षक) यांची भूमिका पूरक आढळली तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता (Rahul Gupta) यांनी दिला आहे. (CBSE Board Exams)
विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी सरकारने कॉपीमुक्त अभियानावर भर दिलेला आहे. त्यानुसार आठ भरारी पथके तैनात केली आहे. या अभियानाचे प्रमुख जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे (Sachin Ombase) आहेत. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांचेही पथक यावेळी कार्यरत असणार आहे. बारावीचे 15 हजार 901 तर दहावीचे 21 हजार 983 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. प्रत्येक केंद्रावर विद्यार्थ्यांची कसून तपासणी केली जाईल.
बारावीच्या परिक्षा मंगळवार २१ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या परीक्षा दोन मार्चपासून सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत कॉपीमुक्त अभियानाची माहिती गुप्ता यांनी दिली. याप्रसंगी शिक्षणाधिकारी गजानन सुसर, सुधा साळुंके, रावसाहेब मिरगणे उपस्थित होते.
त्याचप्रमाणे परीक्षा केंद्राच्या 50 मीटर परिघात झेरॉक्स सेंटर बंद असतील. पर्यवेक्षक तसेच परीक्षेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांशिवाय कोणालाही परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश नसेल. केंद्रावर बंदोबस्तासाठी नियुक्त पोलिस कर्मचाऱ्यांनाही परीक्षागृहात प्रवेश करता येणार नाही. तसे आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. परीक्षा दालनात संबंधित शाळेऐवजी इतर केंद्रातील शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली गेली आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांनीही याची नोंद घेऊन कॉपीपासून दूर राहावे, असे आवाहन सीईओ गुप्ता यांनी केले आहे.
हे सुद्धा वाचा :
कॉपी बहाद्दरांनो सावधान; 10 वी,12 वी परीक्षांबाबत सरकारने उचलले ‘हे’ पाऊल!
CBSE: 10वी-12वी परीक्षेत ChatGPTच्या वापरावर होणार कडक कारवाई!
शिक्षकांचे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी होण्याचे स्वप्न भंगले; शिक्षकांमधूनच पदे भरण्याची मागणी
या परीक्षांसाठी कडक बंदोबस्त
दहावीच्या इंग्रजी, गणित आणि विज्ञान तर बारावीच्या इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, चिटणीसाची कार्यपद्धती, पुस्तपालन व लेखाकर्म, व्यापार संघटन आदी परीक्षांवेळी सर्व परीक्षा केंद्रावर पथके धडक देणार आहेत. त्यासाठी गरज भासल्यास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही मदतही घेतली जाणार आहे. तसेच संवेदनशील परीक्षा केंद्रावर बैठे पथकाची नियुक्ती केली जाणार आहे.