राज्यभरात अनेक विद्यार्थी MH-CET परीक्षेला सामोरे जात आहेत. प्रवेश परिक्षेसाठी महत्त्वाची असणाऱ्या या परीक्षा प्रक्रियेत सध्या गोंधळाचे वातावरण दिसून येत आहे. 5 ते 20 ऑगस्ट या दरम्यान MH-CET परीक्षा पार पडली परंतु यावेळी तांत्रिक अडचण उद्भवल्याने अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. सतत लाॅग आऊट होणे आणि इतर तांत्रिक अडचणी यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पेपर अर्धवटच राहिले. लाखोंच्या संख्येत विद्यार्थी या परीक्षेला बसल्याची पुर्ण कल्पना असताना सुद्धा विद्यार्थांना अडचणींना तोंड द्यावे लागले, त्यामुळे या तांत्रिक बिघाडाला जबाबदार असणाऱ्या कंपनीवर, संबंधीत सेलच्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकारने कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधानसभेत केली.
परीक्षा व्यवस्थेच्या हलगर्जीपणावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, 6 लाख विद्यार्थी या परिक्षेला बसलेले होते, तेव्हा कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे सेलकडून अपेक्षित होते, मात्र उलट घडले व 6 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला. यामध्ये लाखो विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करून नाहक खर्च करावा लागला त्यामुळे त्याला जबाबदार कोण असा सवालच या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.
हे सुद्धा वाचा…
Sonali Phogat : भाजपच्या टिकटॉक स्टार नेत्या सोनाली फोगट यांचा मृत्यू
Shivsena Vs Shidesena : शिवसेनेचा खरा वारसदार आज ठरणार? कोर्टाच्या सुनावणीसाठी उत्सुकता वाढली
धनंजय मुंडे पुढे म्हणाले, ही बाब लक्षात येताच सेलने विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसायची संधी उपलब्ध करून दिली असून त्याबाबत अर्ज करायचा असल्यास रात्री पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परंतु पुन्हा ही प्रक्रिया करण्यासाठी, परीक्षेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा झालेला खर्च व झालेल्या त्रासाची नुकसान भरपाई विद्यार्थ्यांना देण्यात यावी अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली, शिवाय उच्चस्तरावर चौकशी करून तांत्रिक बिघाडाला जबाबदार कंपनी व संबंधीत अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करावी तसेच विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दिलेली मुदत वाढवून द्यावी, या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विषयाची दखल घेत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.