नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amrit Mahotsav) ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभाग व गृह विभाग यांनी एक रचनात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे. कारागृहातील कैद्यांसाठी हा खास कार्यक्रम घेण्यात आला आहे. गुन्हा घडला म्हणून ‘माणूस’ असलेल्या व्यक्तीला तुरुंगात जावे लागते. गजाआड राहिले तरी त्या व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याचा हक्क असतोच. अशा या कैद्यांमध्ये देशप्रेम वाढीस लागावे, योग साधना करून मानसिक व शारीरिक कणखर होता यावे, त्यांचे मनोरंजन सुद्धा व्हावे या उदात्त हेतूने राज्यातील ३६ कारागृहांमध्ये ‘जीवन गाणे गातच जावे…’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती कारागृहांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. कारागृहातील कैदयांना केंद्रस्थानी ठेवून कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. देशाचे स्वातंत्र्य, देशभक्ती, योगासनाचे महत्व, विविध विषयांवरील प्रबोधन, तसेच व्यक्तिगत समुपदेशन असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.
हे सुद्धा वाचा
Azadi Ka Amrit Mahotsav : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हुकूमशाहीचा आणखी एक नमुना
येत्या ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्रातील सर्व ३६ कारागृहांमध्ये एकाच वेळी हा कार्यक्रम होईल. विशेष म्हणजे, कैद्यांना त्यांच्यातील कलागुण सादर करण्याची संधी सुद्धा यावेळी दिली जाणार आहे. त्यामुळे कैद्यांमधील सुप्त कलागुणांना या उपक्रमामुळे वाव मिळेल. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.
‘आझादी का अमृत महोत्सव’ ही मोहीम सध्या भारतभर जोरात सुरू आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातही विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने कैद्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
महाराष्ट्रातील थोर संत, ज्येष्ठ साहित्यीक, महापुरुष यांच्या जीवनकार्यावर हा कार्यक्रम असेल. विविध लोककलांचे यावेळी सादरीकरण केले जाईल. एकाच वेळी ३६ जिल्ह्यांतील कारागृहांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय व गृह विभाग यांच्यामार्फत एकत्रितपणे हा कार्यक्रम होईल, असे सूत्रांनी सांगितले.