पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने मराठी रंगकर्मींना डावलून हिंदी कलावंतांना कार्यक्रम करण्यासाठी बोलावले आणि मराठी कलावंतामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. याविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी मराठी कलावंतांनी आंदोलनाचे शस्त्र हाती घेतले असून यावेळी मराठी माणसाला डावलण्याचा होणारा प्रयत्न आणि कलावंतांवर होणारा अन्याय, त्यांच्यासाठी लागणाऱ्या सुविधांकडे जाणूनबुजून केलेले दुर्लक्ष याकडे लक्ष वेधून घेण्यात येणार आहे. दरम्यान यावेळी भरसाठ भाडे आकारून लाख रुपयांची भाडे दरमहा येथील बँका आणि हॉटेलकडून घेऊन सुद्धा सुविधांच्या नावाने येथे बोंबाबोंब असल्याचे धक्कादायक चित्र उघडकीस आले आहे, त्यामुळे या आंदोलनात या अवाजवी बील दरवाढीविरोधातही आवाज बुलंद होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पु. ल. देशपांडे कला अकादमीची इमारत 2002 मध्ये उभी राहिली, तर 2006 मध्ये रवींद्र नाट्य मंदिर उभे राहिले. पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये मिनी थिएटर्स सोबत तालीम हॉल, कॉन्फरन्स हॉल यांचा समावेश असून याचे शुल्क भरून ते वापरण्यास दिले जाते, तर रवींद्र नाट्य मंदिर येथे सुद्धा शुल्क भरून ते नाटक, संगीत किंवा अन्य सांस्कृतिक कार्यक्रमासाठी त्याचा वापर करण्यासाठी दिला जातो. त्यामुळे येथे दिवसा हजारो प्रेक्षक आणि कलावंतांची रेलचेल पाहायला मिळते.
हे सुद्धा वाचा
Shilpa Bodkhe : आधारकार्ड नसल्याने रुग्णालयाने महिलेला प्रसुतीसाठी नाकारले
Azadi Ka Amrit Mahotsav : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हुकूमशाहीचा आणखी एक नमुना
परंतु दुर्दैवाने आज पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या इमारतीला 20 वर्षे पूर्ण होत असताना सुद्धा येथे साधा पिण्याच्या पाण्याचा नळ बसविण्यात आलेला नाही, तर रवींद्र नाट्य मंदिर येथे पाण्यासाठी थंड कुलर बसविण्यात आला असला तरी या कुलर मधून चक्क गढूळ पाणी येते. पाण्याच्या बाबतीत इतक्या प्रचंड अडचणी असून सुद्धा महिना पाण्याचे बिल सुमारे साडेतीन लाख रुपये येत आहे. दरम्यान थक्क करणारे जुलै महिन्याचे पाण्याचे बिलच लय भारी च्या हाती लागले आहे.
सदर बिलामध्ये 3 जुलै 2022 रोजी मुंबई महापालिकेच्या पाणी खात्याने पु. ल. देशपांडे कला अकादमीला 3 लाख 32 हजार 134 रुपयांचे पाण्याचे बिल पाठवले आहे, तर याच बिलात मागील बाकी 38 लाख 13 हजार 378 रुपये थकीत असून एकूण थकीत देयक बिल 41 लाख 45 हजार 552 रुपये दाखविण्यात आलेले आहे. पु. ल. देशपांडे कला अकादमीत पाण्याचा प्रश्नाने कलावंताने वेठीस आणले असून सुद्धा लाखोंच्या घरात बील येतेच कसे असा प्रश्नच आता थेट विचारण्यात येत आहे.
मराठी कलावंतांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात पहिल्यांदा लय भारीने आवाज उठवला होता, परंतु या अन्यायाचा माग घेत असताना आता अनेक समस्यांचे जाळेच हळूहळू समोर येऊ लागले आहे. या संपुर्ण धक्कादायक गोष्टींच्या उलगड्यानंतर आता तरी स्थानिक प्रशासनाला जाग येणार, मराठी कलावंतांच्या समस्या समजून घेतल्या जाणार का हे पाहणेच आता महत्त्वाचे ठरणार आहे.