गेल्या 14 वर्षांपासून सब टीव्ही या हिंदी वाहिनीवर सुरु असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेमधून शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी अचानक काढता पाय घेतला. त्यांच्या अचानक मालिका सोडण्याने अनेक प्रश्न उपस्थित सुद्धा केले गेले. शैलेश लोढा यांच्या आधी या मालिकेतील प्रेक्षकांचे आवडते पात्र दया बेन अर्थात दिशा वाकाणी हिने सुद्धा मालिका सोडली होती. ती पुन्हा या मालिकेत येणार असे अनेकवेळा सांगितले गेले. पण दिशा वाकाणी या मालिकेत परतली नाही. उलट तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अनेक जुन्या कलाकारांनी या मालिकेला राम राम केला. पण शैलेश लोढा जे या मालिकेत तारक मेहता नावाची भूमिका करत होते त्यांनी ही मालिका सोडल्यानंतर या मालिकेविरोधात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
शैलेश लोढा यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सोडल्यानंतर प्रेक्षकांनी ही मालिका पाहणे देखील बंद केले आहे. पण आता अखेरीस शैलेश लोढा या मालिकेतील एक्झिटबाबत बोलले आहेत. शैलेश लोढा यांनी सांगितले की ते लवकरच मालिका का सोडली याचे कारण सर्वांना सांगणार आहेत. सिनेकलाकारांची मुलाखत घेणाऱ्या सिद्धार्थ कनन यांच्या शोमध्ये नुकतीच शैलेश लोढा यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.
तारक मेहता या शोमध्ये गेली 14 वर्षे काम केले. या शो बरोबर भावनिकरीत्या मी जोडलो गेलो आहे आणि होतो. मी रोज मालिकेच्या सेटवर जायचो, काम करायचो.. मी संयमी माणूस नाही. परंतु या मालिकेसाठी मी स्वतःवर खूप संयम ठेवला, असेही यावेळी शैलेश लोढा यांनी सांगितले. महत्वाची बाब म्हणजे ते नेमक्या कोणत्या संयमबाबत बोलत होते, हे मात्र त्यांनी सरळपणे सांगितले नाही.
हे सुद्धा वाचा
Mumbai-Pune Express Way Accident : मुंबई पुणे महामार्गावर भिषण अपघात! धावत्या ट्रकने घेतला पेट
काही तरी कारण आहेत. असं नाही की मी कधी याबद्दल बोलणार नाही. बोलणार तर नक्कीच आहे फक्त योग्य वेळ आली की, मी ही मालिका का सोडली हे नक्कीच सांगेल, असे शैलेश लोढा यांच्याकडून सांगण्यात आले. शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडल्यानंतर त्यांची या मालिकेचे दिग्दर्शक असित मोदी यांच्यासोबत वाद झाल्याचे देखील बोलले गेले. तर असित मोदी यांच्या मालिकेतील टीममधील लोकांकडून देखील शैलेश लोढा यांना या मालिकेत काम करण्यासाठी पुन्हा येण्याची विनंती देखील करण्यात आल्याचे बोलले गेले.
दरम्यान, या मालिकेचे दिग्दर्शक यांनी याआधी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश लोढा यांना या मालिकेत पुन्हा आणण्याचे अनेक प्रयत्न केले गेल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांची वाट देखील पाहिली गेल्याचे बोलले जाते. परंतु शैलेश लोढा या मालिकेत न परतल्याने त्यांच्या जागी अभिनेता सचिन श्रॉफ यांची तारक मेहता म्हणून निवड करण्यात आली.