29 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeलेखसहकारातील संत - स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात

सहकारातील संत – स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात

उल्हासदादा पवार

शेतकरी कुटुंबातील जन्म,जोर्वे गावी प्राथमिक शिक्षण,पुढे बोर्डिग मध्ये शिक्षण घेत असतांना त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रभावीत होऊन विद्यार्थी दशेतच वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. १९४२ च्या आंदोलनातील ब्रिटीशांविरुध्दाच्या कारवायांमुळे त्यांना १५ महिने तुरुंगवास झाला मात्र या काळात डॉ.अण्णासाहेब शिंदे यांचा सहवास व त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव भाऊसाहेबांवर पडला. १९४३ मध्ये सुटका झाल्यानंतर ही त्याच विचारांनी प्रेरीत झालेल्या भाऊसाहेबांनी महात्मा गांधींची ग्रामीण विकासाची संकल्पना घेवून आपले समाज विकासाचे कार्य सुरु केले.

गोरगरिब,शेतकरी यांचे जिवनमान उंचविण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी संघटीत केले. त्यांच्यासाठी विविध मोर्चे,आंदोलने केली सोसायटीचे अध्यक्षपद ते राज्य सहकारी बँकेचे अध्यक्षपद हा त्यांचा सहकारातील प्रवास सर्वसामान्यांच्या उध्दाराचा राजमार्ग ठरला. त्याच काळात सरकारला सहकारात भाऊसाहेंबामुळे एक कायदाही पास करावा लागला. स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांसाठी त्यांनी सहकाराचा मार्ग निवडला होता. स्व. यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील यांच्या विचारातून काम करतांना त्यांना संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याची मुहूर्त मेढ रोवली. दुष्काळी भागात व अत्यंत माळरानावर प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेला हा कारखाना सहकारी कारखानदारीसाठी दिपस्तंभ ठरला.कमी प्रर्जन्यमान,सरकारी धोरणांचे अडथळे,आर्थिक अडचणी तरी ही दादांच्या दुरदृष्टीच्या आराखड्यातून उभा राहिलेला हा कारखाना आर्थिक दृष्ट्या सक्षम ठरला आहे. ८०० मे टन ते ५५०० मेट्रीक टन क्षमता अशी दमदार वाटचाल करणाऱ्या या कारखान्याने शेतकरी व ऊस उत्पादकांचा मोठा विश्वास जपतांना कायम उच्चांकी भाव दिला आहे. दादांची आर्थिक शिस्त, पारदर्शकता,काटकसर व आधुनिकता ही चतुःसूत्री अनेकांना मार्गदर्शक ठरले आहे. त्यांच्या ग्रामीण विकासाच्या पायाभूत आराखड्याची अनेक वेळा शासनाने ही दखल घेवून अंमलबजावणी केली आहे.

कारखानदारी बरोबर पूरक उद्योग सुरु करतांना त्याकाळी सौरऊर्जेबाबद दाखविलेली दुरदृष्टी किती व्यापक व काळाची गरज ओळखून होती हे आज लक्षात येते. आर्थिक फायदा असला तर दारु उत्पादन करायचे नाही. हा त्यांचा दुढ निश्चय किती महत्चाचा ठरला शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे व समाजाचे स्वास्थ व आरोग्यचे भान जपणाऱ्या या नेत्याची सामान्यबद्दल आपुलकीची भावना यामधून राज्याला कळाली. प्रत्येक कुटुंबाचा काळजी वाटणारा नेता अशी ही भावना सर्व कालीन वंदनीय ठरते. ग्रामीण विकासासाठी सहकारातून दूग्धक्रांती घडवितांना गावोगावी दुध सोसायट्यांची निर्मिती केली. शेतकऱ्यांना दुधाचा जोडधंदा निर्माण करुन अनेक कुटुंबामध्ये समृध्दी आणली. याच बरोबर सह्याद्री,अमृतवाहिनी या गुणवत्तेच्या शैक्षणिक संस्था उभया केल्या.आज अमृतवाहिनी शैक्षणिक संकुलनात इंजिनिअरींग,तंत्रनिकेतन,एम बी ए,फार्मसी,माॅडेल स्कूल,आय.टी.आय,इंटरनॅशनल स्कूल अशा वेगवेगळ्या महाविद्यालयातून सुमारे दहा हजार विद्यार्थी उच्च तंत्रशिक्षण घेत आहे.या संस्थेतील हजारो युवक देश विदेशात उच्च पदावर काम करत आहे. गावोगावी रस्ते,शाळा,बंधाऱ्यांचे जाळे असे अनेक विकासाचे कामे केली आहे.

याचबरोबर या संपूर्ण परिवाराने कायम समाजकार्याचे व्रत जपले आहे डॉ.अण्णासाहेब शिंदे यांचे परिवारीक व गुरुशिष्याचे स्नेह जपत भाऊसाहेबांनी समाजाच्या विकासाचा, सामाजिक समतेचा,आर्थिक विकासाचा व पुरोगामी विचारांचा वारसा जपला. यामध्ये डॉ.अण्णासाहेब शिंदे,ॲड रावसाहेब शिंदे यांचे वैचारिक मार्गदर्शन मिळाले.हाच समृध्द वारसा राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात,जावई आमदार डॉ.सुधीर तांबे,नातू सत्यजित तांबे यांनी सांभाळला आहे.त्यांची प्रेरणा व आशिर्वाद सदैव संपूर्ण राज्यातील सहकारावर व संगमनेर तालुक्यावर राहिले आहे.

राज्याच्या राजकारणात वयाने कमी असलेल्या शरदचंद्र पवार यांना बोलावून त्यांना राष्ट्रीय राजकारणात साथ दिली. प्रेम व आशिर्वाद दिला. परंतू १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली. त्यावेळी भाऊसाहेबांनी आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही व काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक राहिले. मात्र शरद पवार यांना आपल्या विचारांची स्पष्ट कल्पना दिल्याने त्यांचे व पवार साहेबांमध्ये कधीही वितुष्ठ आले नाही. हा स्नेह आजही कायम राहिला आहे. पुढे मराठवाड्यातील नेते विलासराव देशमुख यांच्या पाठीशी भक्कम उभे राहत त्यांनी त्यांना आशिर्वाद दिले. अनेक वेळा त्यांना विविध कार्यक्रमात बोलाविले विलासरावांच्या राजकारणात भाऊसाहेबांनी कायम मोठा वाटा उचलला.

१९८४ मध्ये अमृतवाहिनी कॉलेज मध्ये झालेल्या त्यांच्या ६१ व्या कार्यक्रमाला स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील हे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी व युवक कार्यकर्ता म्हणून यशवंतराव गडाख यांनी भाषण केले. ही भाषणाची संधी माझ्यासाठी मोठा अनमोल ठेवाआहे. भाऊसाहेबांचे स्व.यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील,शंकरराव चव्हाण,विलासराव देशमुख,वसंतराव नाईक,शरदचंद्र पवार या सर्व नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या पूर्ण वाटचालीत जनरेशन गॅप हा प्रकार त्यांनी पडू दिला नाही. युवकांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले.

२५ नोव्हेंबर हा यशवंतराव चव्हाणांचा स्मृती दिन कराड व संगमनेर मध्ये साजरा होतो. एका कार्यक्रमासाठी आमदार बाळासाहेब थोरातांनी मला बोलविले. या कार्यक्रमात भाऊसाहेबांनी माझे पूर्ण भाषण ऐकले व भाषण झाल्यानंतर जवळ बोलावून कौतुकाची थाप दिली. आयुष्यभर समाज घडविण्यांचे काम त्यांनी केले. सध्या विज्ञानवादाने माणूस विकसीत झाला कि बिघडला हा मोठा चिंतनाचा विषय आहे. परंतू अखंडपणे जिल्हा बँक,राज्य बँक,सहकाराचे नेतृत्व करतांना भाऊसाहेबांच्या स्वच्छ नेतृत्वावर कधीही डाग लागला नाही. त्यांच्या संपूर्ण जिवनकार्यातील विविध टप्प्यांवर सामाजिक,शेती,पर्यावरण,शिक्षण,ग्रामीण विकास अशा क्षेत्रात अलौकिक भरीव कामगिरी केली. त्यांनी त्यांच्या जिवनामध्ये राबविलेले तत्वांचा शोध घेवून वाटचाल करणे गरजेचे आहे. अशा पुरुषांचा विचार हा जिवनाला ऊर्जा देवून जातो. विचारवंत बाळासाहेब भारदे म्हणायचे शासनाचे कार्यक्रम विकासासाठी राबविले पाहिजे नाही तर कार्यक्रमांचे कार्यक्रम हा सुध्दा कार्यक्रमच होतो. स्व.भाऊसाहेबांनी मात्र कायम समाजविकासाचे कार्यक्रम राबविले. त्यांची अंमलबजावणी केली त्यातून तालुक्यातील जनतेचा आर्थिक स्तर विकसीत केला. राज्याला दिशा देणाऱ्या या सहकारातील संतास कोटी कोटी प्रणाम!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी