34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदेंनी माझ्या कानात सांगितले असते तरी त्यांना मुख्यमंत्री बनविले असते :...

एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात सांगितले असते तरी त्यांना मुख्यमंत्री बनविले असते : अजित पवार

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदे, तुम्ही आमच्या मंत्रिमंडळात नगरविकास खात्याचे मंत्री होता. मग तुम्ही असे का केले ? तुम्ही माझ्या कानात सांगितले असते तरी मी उद्धवजींना बोललो असतो. त्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री बनविले असते. आदित्यजी, बनविले असते ना मुख्यमंत्री, अशा शब्दांत अजित पवार यांनी शिंदे यांची फिरकी घेतली.
विधानसभेच्या अध्यक्षपदी राहूल नार्वेकर यांची निवड झाली. नार्वेकर यांच्या अभिनंदन ठरावावर बोलताना अजितदादांनी शिंदे, नार्वेकर व भाजप यांना चिमटे काढले.

अजित पवार म्हणाले की, राहूल नार्वेकर पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांना मी सन 2014 मध्ये मावळ मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट दिले होते. पण त्यावेळी नरेंद्र मोदी यांची मोठी लाट होती. या लाटेत नार्वेकर यांचा पराभव झाला.
नार्वेकर यांचे कौतुक केले पाहीजे. ते जिथे जातात तिथल्या नेतृत्वाला जवळ करतात. त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून काम केले. शिवसेनेत असताना ते आदित्य ठाकरे यांच्या फार जवळ होते. आदित्य ठाकरेंना त्यांनी कायदेशीर बाबींचे शिक्षण दिले. नंतर ते राष्ट्रवादीत आले अन् माझ्या जवळ आले. भाजपमध्ये गेल्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ गेले. एकनाथ शिंदेजी, तुम्हीही राहूल नार्वेकरांना जवळ करा. नाहीतर तुमचं काही खरं नाही, असाही अजितदादांनी सावधगिरीचा सल्ला दिला.
सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार अशा भाजपच्या वरिष्ठ मंडळींना जमले नाही ते नार्वेकर यांनी तीन वर्षांत करून दाखविल्याचीही पुस्ती अजितदादांनी जोडली.

नार्वेकर हे रामराजे नाईक – निंबाळकर यांचे जावई आहेत. म्हणजे ते आमचेही जावई आहेत. जावयांनी सासरच्या पक्षाचा हट्ट पुरवायचा असतो. विधानसभेच्या अध्यक्षपदी जावई, तर विधानपरिषदेच्या सभापतीपदी सासरे असा पहिल्यांदाच प्रसंग आलेला आहे. नार्वेकर व निंबाळकर या दोन्ही कुटुंबांचे मी अभिनंदन करतो.

गिरीश महाजन अजूनही फेटा काढून अश्रू पुसताहेत
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे सगळ्यांनाच वाटले होते. त्या दिवशी आम्ही सुद्धा टिव्हीवर पत्रकार परिषद पाहात होतो. देवेंद्रजींनी एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले, अन् टाचणी पडावी अशी शांतता पसरली. अख्ख्या महाराष्ट्राला धक्का होता. भाजपचे १०५ आमदार तरी आनंदीत आहेत का, असा सवाल अजितदादांनी केला.
गिरीश महाजन तर, त्या दिवशापासून रडत आहेत. अजून त्यांचे रडणे थांबलेले नाही. डोक्यावरचा फेटा काढून ते अश्रू पुसत आहेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी भाजप नेत्यांच्या जखमेवरील खपली काढली.

भाजपमध्ये अनेकांनी भिंती रंगविल्या. आंदोलने केली. पण सरकारमध्ये बसताना मुळचे भाजपचे मान्यवर कमी आहेत. समोरच्या रांगेत बघितले तर गणेश नाईक, बबनराव पाचपुते, उदय सामंत, दीपक केसरकर ही आमच्याकडून गेलेली मंडळीच दिसत आहेत. त्यामुळे मूळ भाजपवाल्यांविषयी मला फार वाईट वाटत आहे.
दीपक केसरकर तर पहिल्यांदाच चांगले प्रवक्ते म्हणून समोर आले आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही जे शिकविले ते कुठे वाया गेले नाही. हे दिसतंय, असाही टोला त्यांनी हाणला.

हे सुद्धा वाचा : 

एकनाथ शिंदे म्हणाले; सर्वांना वाटले होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, पण…

राज्यपालांच्या भूमिकेवर वर्षा गायकवाड यांनी साधला निशाणा

शिवाजीराव आढळराव – पाटील हे शिवसेनेतच, त्यांची हकालपट्टी नाही!

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी