टीम लय भारी
औरंगाबाद : शिवसेनेतील बंडामुळे राज्यातील संपुर्ण राजकारणाची समीकरणेच बदलली आणि सरकार म्हणून शिंदे – फडणवीस विराजमान झाले. या सत्तांतराच्या नाट्यानंतर शिंदे गट आणि भाजपला आता येत्या महापालिका निवडणुकीचे वेध लागले असून इथेसुद्धा विजय मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे. दरम्यान येत्या महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट आणि भाजपने औरंगाबाद महापालिकेची निवडणुक एकत्र लढविणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राजकीय वर्तुळातून समोर आली आहे, त्यामुळे राज्याला यानिमित्ताने पुन्हा एकदा एका नव्या युतीचे दर्शन घडणार आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप – शिंदे गटात काल प्राथमिक बैठक पार पडली. याबाबतची माहिती शिंदे गटातील औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दिली आहे. यावेळी बोलताना जंजाळ म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुका लढवण्याचा निर्णय झालाय. जागावाटपाबाबत वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेऊ. औरंगाबादमधील अनेक चांगले नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. हिंदुत्वासाठी एकत्र निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे आम्हाला चांगले यश मिळेल असा विश्वास त्यांना यावेळी व्यक्त केला.
दरम्यान,राज्यात शिंदे – फडणवीसांचे एकत्रित सरकर स्थापन झाले असून यापुढील निवडणुक एकत्रितपणे लढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर केल्यामुळे त्यांनी आधीच मास्टरस्ट्रोक मारला आहे, शिवाय औरंगाबादमधील सर्वच आमदार शिंदेगटात सामील झाले आहेत त्यामुळे शिंदे गट – भाजप यांच्या एकत्रित लढाईमुळे शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे सुद्धा वाचा…
मोदी सरकारच्या काळात ईडीचे फावले? अर्थमंत्र्यांकडून ‘हे’ स्पष्टीकरण