टीम लय भारी
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यापासून भारताचे रक्षण करणाऱ्या आपल्या वीरांना स्मरण आणि अभिवादन करण्याचा दिवस म्हणजेच कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas). कोणत्याही सैन्याला लढण्यासाठी कारगिल हा सर्वात कठीण भूभाग होता. पाकिस्तानी सैन्याला उंचीचा फायदा होता. तथापि, भारतीय सैनिकांनी अदम्य शौर्याने लढा दिला आणि 26 जुलै 1999 रोजी ‘विजय’ नावाच्या ऑपरेशनमध्ये टायगर हिल आणि इतर प्रमुख चौक्या पुन्हा ताब्यात घेतल्या.
या युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना माघार घ्यावी लागली. यावेळी 453 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. तीन महिने हे युद्ध सुरु होते. या युद्धात 527 भारतीय जवानांनी हौतात्म्य पत्करले. भारताच्या विजयाचे स्मरण करण्यासाठी आणि युद्धात अंतिम बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.
कारगिल युद्धाचा घटनाक्रम
3 मे 1999 : बटालिक येथील जुबर रिजलाइन येथे पाकिस्तानी सैनिक आणि अतिरेक्यांच्या घुसखोरीबाबत स्थानिक मेंढपाळांनी भारतीय लष्कराला सतर्क केले.
5 मे 1999 : पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्कराच्या किमान पाच सैनिकांना पकडून ठार केले.
9 मे 1999 : पाकिस्तानी सैन्याने कारगिल येथील भारतीय लष्कराच्या दारूगोळा डेपोवर हल्ला केला.
10 मे 1999 : पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेच्या पलीकडे असलेल्या काकसार आणि द्रास सेक्टरमध्ये घुसखोरी केली. भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन विजय’ सुरू केले.
21 मे 1999 : 8 शीख रेजिमेंटने टायगर हिलला वेढा घातला जो प्रदेशातील सर्वोच्च शिखर आहे.
23 मे, 1999 : भारतीय लष्करप्रमुखांनी कारगिल सेक्टरला भेट दिली आणि घुसखोरांचा खात्मा करण्याच्या पुढील योजनांवर चर्चा केली.
26 मे 1999 : भारतीय हवाई दलाने हवाई हल्ले सुरू केले ज्यामुळे पाकिस्तानी सैनिकांचे मोठे नुकसान झाले.
1 जून 1999 : आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताची बाजू घेतली. भारताविरुद्ध बेजबाबदार लष्करी कारवाईसाठी अमेरिका आणि फ्रान्सने पाकिस्तानला जबाबदार धरले.
5 जून, 1999 : भारताने पाकिस्तानी लष्कराचा सहभाग उघड करणारे डॉजियर जारी केले.
9 जून 1999 : भारतीय लष्कराच्या जवानांनी बटालिक सेक्टरमधील दोन महत्त्वाच्या स्थानांवर पुन्हा ताबा मिळविला.
13 जून 1999 : भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलला भेट दिली. त्याच दिवशी भारतीय लष्कराने टोलोलिंग शिखरावर पुन्हा ताबा मिळवला.
4 जुलै 1999 : भारतीय लष्कराने टायगर हिल पुन्हा ताब्यात घेतला.
5 जुलै 1999 : नवाझ शरीफ यांनी कारगिलमधून पाकिस्तानी सैन्य मागे घेण्याची घोषणा केली.
12 जुलै 1999 : पाकिस्तानी सैनिकांना माघार घ्यावी लागली.
26 जुलै 1999 : भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या ताब्यातील सर्व जागा पुन्हा ताब्यात घेतल्या. आणि ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी ठरले.
या युद्धाचा मास्टरमाईंड तत्कालीन पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही या प्रकरणात अडकवले गेले. त्यानंतर शरीफ मदतीसाठी अमेरिकेला गेले पण अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी नकार दिला. हे युद्ध दोन्ही शेजारी राष्ट्रांसाठी धडा होता. पाकिस्तानच्या लक्षात आले की भारताच्या लष्करी सामर्थ्याशी आपला कोणताही सामना नाही आणि भारताला समजले की आपली गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली आहे.
हे सुद्धा वाचा :
मंत्री मंडळाचा विस्तार न करताच शिंदे सरकारने घेतले ५०० पेक्षा अधिक निर्णय
सीएसएमटी स्थानकातून पनवेलला जाणारी ट्रेन बफरला धडकली
‘त्यांचे केवळ राजकारणासाठी हिंदुत्व…!’ शिवसेनाप्रमुख ठाकरेंचा शिंदेगटावर थेट आरोप