राज्यातील शेतकऱ्यांवर परतीच्या पावसामुळे संकट कोसळलेले आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. याच नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पिक पाहणी दौरा आयोजित केला आहे. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी संभाजी नगर जिल्ह्याचा नुकसानग्रस्त भागातील पिक पाहणी दौरा केला. या दौऱ्यामुळे सत्ताधारी पक्षातील काही लोकांकडून त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली. पण याकडे उद्धव ठाकरे यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले. तसेच शेतकऱ्यांना त्यांनी ते त्यांच्यासोबतच आहेत असे आश्वासन देखील दिले. आता उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे सुद्धा परतीच्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झाले आहे, त्यांची भेट घेण्याकरिता आणि पाहणी करण्याकरिता पोहोचले आहेत.
गुरुवारी (ता. 27 ऑक्टोबर) आदित्य ठाकरे हे नाशिक आणि पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या दौऱ्यामध्ये सहभागी झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी आज या दौऱ्याच्या सुरुवातीलाच नाशिक जिल्ह्यात असलेल्या इगतपुरी येथील धामणगाव येथे भेट दिली.
धामणगाव या भागात देखील परतीच्या पावसाने अतिवृष्टी केलेली होती. परतीच्या पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आदित्य ठाकरे भेट देत आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांनी धामणगाव मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. याआधी देखील तुम्ही शेतकऱ्यांनी आलेल्या अनेक संकटाचा सामना केलेला आहे, आत्ताही तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे उपस्थित शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
या दौऱ्यामध्ये ते नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सिन्नर तालुक्यातील गावांना देखील भेट देणार आहेत. तसेच यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील पांढुर्ली गावातील ग्रामस्थांची सुद्धा भेट घेतली. या भेटीमध्ये आदित्य ठाकरे यांनी पांढुर्ली गावातील ग्रामस्थांनी दिलेले निवेदन स्वीकारले तसेच त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नाशिक येथील नुकसानग्रस्त पाहणी दौरा करून आदित्य ठाकरे हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आणि शिरूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची देखील पाहणी करणार आहेत.
हे सुद्धा वाचा
Gajanan Kale on Uddhav Thackeray : मनसेच्या गजानन काळेंना उद्धव ठाकरेंची पाठ सोडवेना
Ambadas Danve : अंबादास दानवे उद्या नाशिक, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार
याआधी उद्धव ठाकरे यांनी संभाजी नगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले तेथे पिक नुकसान पाहणी दौरा केला होता. हा एक दिवसीय दौरा काही तासांचा असल्याने उद्धव ठाकरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांमधील काही लोकांकडून टीका सुद्धा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजाजन काळे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्याचे परिपत्रक सोशल मीडियावर पोस्ट करत फक्त 15 मिनिटांचा पाहणी दौरा असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.