पुणे शहरात सोमवारी (16 ऑक्टोबर) पावसाने धुमाकूळ घातला. या पावसामुळे पुण्यात ठिकठिरकाणी रस्त्यावर पाणी तुंबल्याचे आणि रस्ते जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अशा परिस्थीत अनेक राजकिय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे माहापालिकेत गेली 5 वर्ष सत्तेत असणाऱ्या भाजपवर निशाणा साधला आहे. याच कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक ट्विट शेअर करत भाजपवर तोफ डागली आहे. “स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे.” असा आरोप अजित पवारांनी यावेळी केला.
सोमवारी पुणे शहरात सायंकाळी पावसाने जोर धरला. शहरातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. शहरातील मुख्य रस्ते असणाऱ्या टिळक रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, फर्ग्यूसन कॉलेज रोड शिवाय अल्का चौक आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर रस्त्यांवरून नदी वाहत असल्याप्रमाणे चित्र उभे राहिले होते. त्यावरून आता अजित पवारांनी महापालिकेत गेली 5 वर्षे सत्तेत असणाऱ्या भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे.
हे सुद्धा वाचा
Mumbai Airport Closed : मुंबई विमानतळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 बंद राहणार! प्रमुख कारण आलं समोर
“स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला ‘अव्यवस्थेची’ कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील.” अशा आशयाचे एक ट्विट शेअर करत अजित पवारांनी थेट महापालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला 'अव्यवस्थेची' कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील.#punerains
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 18, 2022
राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी यासाठी अजित पवारांनी उद्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची वेळ मागितली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्यांच्याकडे हे विषय मांडणार आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करतो असे सरकारने सांगितले होते मात्र अद्याप पैसे जमा केलेले नाही असे शेतकरी सांगत आहेत अशी दयनीय अवस्था राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, आता पुण्यात पावसामुळे झालेल्या नुकसानावर राज्य सरकार काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षात महापालिकेने पुणे शहरात पाणी साचू नये यासाठी काय उपाययोजना केल्या आणि स्मार्ट सिटीच्या नावावर खर्च झालेला पैसा गेला कुठे या सर्व गोष्टींची चौकशी करण्याची मागणी पुण्यातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.