राज्यात ठिकठिकाणी मेंढपाळांना (herdsmen) मारहाण करून त्यांच्यावर खोटे गुन्हे (Fake FIR) दाखल करण्याचे प्रकार समोर येत आहेत. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली. या विषयावर त्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारा चर्चा उपस्थित केली.
मेंढपाळांना उदरनिर्वाहासाठी गावात काही जमीन क्षेत्र राखीव ठेवावे आणि प्रायोगिक तत्त्वावर चराई वनजमीन मेंढपाळांना उपलब्ध करून द्यावी. तसेच पशुविमा संरक्षण देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी सूचना दानवे यांनी केली.
कोणताही गुन्हा दाखल करताना सखोल चौकशी करावी अशा सूचना नऊ वेळा गृहविभागाने दिल्या आहेत.असे असतानाही काही पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी चुकीच्या पद्धतीने अन्याय, अत्याचार करून खोटे गुन्हे दाखल करत असतील तर त्याची माहिती दिल्यास व्यक्तीगत चौकशी केली जाईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दानवे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना दिली.
हे सुद्धा वाचा
टीईटी घोटाळ्यात मंत्री, धिकाऱ्यांच्या मुलांची नावे असल्याने कारवाईला उशीर; अजित पवार यांचा आरोप
‘शेतकऱ्यांना भरपाईपोटी विमा कंपन्यांकडून १०० रुपयांचा धनादेश देणे लाजीरवाणे’
…इतर कुणाची ती पात्रता नाही; नाना पटोले यांचा सणसणीत टोला
मेंढपाळांना उदरनिर्वाहासाठी ९०० हेक्टर जमीन निश्चित केली असून ती अर्धबंदीस्त स्वरूपात असणार आहे. तसेच या संदर्भात उपमुख्यमंत्री यांना विनंती करुन सर्व सचिव संबंधित मंत्री व चर्चेत विविध मुद्दे उपस्थित केलेले सदस्य यांची एकत्रित बैठक लावण्यात येईल अशी ग्वाही वनमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
आज विधानसभेत अंबादास दानवे यांनी मेंढपाळांवरील खोट्या गुन्ह्यांचा प्रश्न उपस्थित केला. तसेच मेंढपाळांना त्यांच्या मेंढ्याना चरण्यासाठी जमीन उपलब्ध नसल्याचे देखील त्यांनी लक्षात आणून दिले, त्यामुळे मेढ्या चारण्यासाठी राखीव क्षेत्र ठेवण्याचा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यावर वनमंत्री मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.