माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी सत्ताधाऱ्यांना आपल्या पत्राच्या माध्यमातून खडेबोल सुनावले आहेत. राज्य सरकारला महिना उलटला असला तरी मंत्री मंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. पण सरकारमधील दोघांना दर ७२ तासांनी दिल्लीला पळायचे आहे, असे सुद्धा अनिल गोटे यांनी त्यांच्या पत्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनिल गोटे यांनी सत्ताधारी आणि केंद्रीय यंत्रणांना फैलावर घेतले आहे. ते त्यांच्या फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, ईडी अधिकारी यांच्यावर नेहमीच थेट तोफ डागत असतात.
हे सुद्धा वाचा
भाजपचा शिवसेना फोडण्याचा पहिला डाव यशस्वी : माजी आमदार अनिल गोटे
बंडखोर आमदारांचा खर्च कोण करतेय, अनिल गोटेंनी केली ईडीकडे तक्रार !
आमदार उद्धव ठाकरेंची भेट घेतात, अन् तिथून गुवाहाटीला जातात हे आश्चर्यकारक : अनिल गोटे
सध्या राज्यामध्ये काही भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे पिके पाण्याखाली गेलेली आहेत. इतके होऊनसुद्धा अतिवृष्टीमुळे नासाडी झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांच्या बांध्यावर सरकारचा एक अधिकारी फिरकलेला नाही, ज्यामुळे आकाशातून कोसळणारा पाऊस थांबवावा की, शेतकऱ्यांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू थांबवावेत असे अनिल गोटे यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे.
राज्यकर्त्यांनो लाज बाळगा !@mieknathshinde @Dev_Fadnavis @ShivSena @ShivsenaComms pic.twitter.com/sR9d4ohNgJ
— Anil Gote (@anil_anna_gote) August 8, 2022
त्यांनी या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा तोफ डागली आहे. सत्ताधारी हे कोडगे झाले आहेत. तर दर ७२ तासांनी मुंबई-दिल्ली फेऱ्या मारण्यात काही जण थकले असल्याचा टोला अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लगावला आहे. देशाचा पोशिंदा देशोधडीला लागला आहे, पण खुर्ची टिकावी कशी ? या नादात काही मंत्री विश्रांती घेत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, इतके निर्लज्ज, कोडगे आणि हृदयशून्य राजकारणी महाराष्ट्राने याआधी कधीच पाहिलेले नाहीत. सध्या सत्ताधारी आपला मंत्रिमंडळात नंबर लागेल की नाही याचं विचारात आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्याची अशी दयनीय अवस्था झालेली आहे, पण अद्यापही सत्ताधारी आपल्या कुरघोड्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने कोणाकडे पाहावे ? असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे मत माजी आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केले आहे.