28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रअशा वातावरणात त्यांनी येथे येऊ नये अन्यथा..., बोम्मईंचा पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला...

अशा वातावरणात त्यांनी येथे येऊ नये अन्यथा…, बोम्मईंचा पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला इशारा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी (5 डिसेंबर) सांगितले की, महाराष्ट्राच्या नेत्यांनी बेळगावीला भेट दिल्यास काय पाऊले उचलली जावीत याविषयी आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, तसेच सरकार त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही.

कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई मंगळवारी (6 डिसेंबर) कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (एमईएस) कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्याशी सीमा विवादावर चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी (5 डिसेंबर) सांगितले की, महाराष्ट्राच्या नेत्यांनी बेळगावीला भेट दिल्यास काय पाऊले उचलली जावीत याविषयी आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, तसेच सरकार त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. सीएम बोम्मई म्हणाले की, महाराष्ट्राच्या दोन्ही मंत्र्यांच्या प्रस्तावित बेळगाव दौऱ्याबाबत आमच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, अशा वातावरणात त्यांनी येथे येऊ नये अन्यथा परिस्थिती बिकट होईल.

बोम्मई म्हणाले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोकांमध्ये एकोपा असला तरी त्याचवेळी दोघांमध्ये सीमावादही आहे. ते म्हणाले की, कर्नाटकच्या मते, दोन्ही राज्यांमधील हा सीमावाद हा एक बंद अध्याय आहे, परंतु महाराष्ट्र हा मुद्दा वारंवार मांडत आहे. या प्रकरणाबाबत ते सर्वोच्च न्यायालयातही गेले असून, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना, अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील मंत्री येथे येणे चिथावणीखोर आणि येथील जनतेला भडकावणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी इथे येऊ नये. आपल्या मंत्र्यांना येथे पाठवू नका, अशी विनंती मी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

इंदू मिलवरील स्मारक लवकरच पूर्ण होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महापरिनिर्वाण दिनी ग्वाही

बाबरी मशीद वादावरून अयोध्येत कडेकोट बंदोबस्त

कर्नाटक सीमा भागाचा दौरा करायचा की नाही हे मुख्यमंत्री ठरवतील, फडणवीसांचे वक्तव्य

दरम्यान, कर्नाटक रक्षा वेदिके (KRV) कार्यकर्त्यांनी सोमवारी बेळगावी येथील राणी चेन्नम्मा सर्कल येथे निदर्शने केली. जिल्हा प्रशासनाने दोन्ही मंत्र्यांना बेळगावी जाऊ देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. नुकताच कन्नड ध्वज फडकावणाऱ्या कन्नड विद्यार्थ्याला मारहाण करून अपमान करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी विनंतीही त्यांनी सरकारला केली. संतप्त कार्यकर्त्यांनी चेन्नम्मा सर्कल ते डीसी कार्यालयापर्यंत रॅली काढून डीसी नितेश पाटील यांना निवेदन दिले.

बेळगावचे डीसी नितेश पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना बेळगावमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. सोमवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्रातील दोन मंत्री आणि एका खासदाराच्या दौऱ्याच्या योजनांची माहिती मला मिळाली आहे. यापूर्वी 3 डिसेंबरला त्यांचा दौरा प्रस्तावित होता. मला बेळगाव शहराचे पोलिस आयुक्त आणि जिल्ह्याचे पोलिस अधीक्षकांनी कळवले आहे. ते जिल्ह्यात आल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. मंत्री आपला दौरा रद्द करतील अशी आमची अपेक्षा आहे. अन्यथा कारवाई करू.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी