यंदाची सर्वसामान्यांची दिवाळी चांगली जावी, गरिबांना आनंदात दिवाळी साजरी करता यावी यासाठी राज्य सरकारकडून पात्र शिधा धारकांना आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) देण्याची घोषणा करण्यात आली. हा शिधा पात्र धारकांना दिवाळीच्या आधी मिळणे अपेक्षित होते, परंतु दिवाळी होऊन आठवडा उलटत आला असला तरी अद्यापही अनेकांना हा आनंदाचा शिधा मिळालेला नाही. राज्य सरकारडून आनंदाच्या शिधाच्या मार्फत लोकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणा डाळ आणि एक लिटर पामतेल मिळणार असे जाहीर केले होते. पण राज्यातील असे अनेक लोक आहेत ज्यांना ही सुविधा मिळू शकलेली नाही. ज्यामुळे लोकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
दरम्यान दिवाळी होऊन सुद्धा अद्यापही लोकांना आनंदाचा शिधा न मिळाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वान येथे काही ग्राहकांनी रेशन दुकानदारास मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. आनंदाचा शिधा आणि गेल्या महिन्यातील गहू का दिले नाही ? असा जाब विचारत काही ग्राहकांकडून दुकानदारास जबर मारहाण करण्यात आली. यावेळी ज्यांनी रेशनिंग दुकानदारास मारहाण केली, ते इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी दुकानाची तोडफोड देखील केली. तसेच दुकानातील रेशन वाटपासाठी लागणाऱ्या ई-पॉज मशीन सुद्धा फोडली. या घटनेनंतर या घटनेतील आरोपीला तामगाव पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव वान येथील रेशन दुकानदार श्रीकृष्ण पिंजरकर आणि त्यांचा नातू ऋषिकेश हे दुकानात इतर ग्राहकांना रेशन वाटप करत होते. याचवेळी त्याठिकाणी याच गावातील रहिवासी मोहन कुरवाळे आणि इतर काही नागरिक जमा झाले. त्यांनी रेशन दुकानदार पिंजरकर यांना आनंदाचा शिधा आणि गेल्या महिन्यातील गहू का नाही दिले असे विचारण्यास सुरुवात केली. याचवेळी रेशन दुकानदार आणि मोहन कुरवाळे यांच्यात वाद झाला. यातूनच रेशन दुकानदार पिंजरकर आणि आणि त्यांच्या नातवावर हल्ला करण्यात आला.
हे सुद्धा वाचा
Anandacha Shidha : दिवाळीतील आनंदाचा शिधा आता ऑफलाईन मिळणार
Anandacha Shidha : सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा पडतोय महागात
Elon Musk : ट्विटरवर हेट कंटेंटेमध्ये वाढ; बड्या अधिकाऱ्यांमध्ये राजीनाम्यांचा धडाका सुरूच
दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्यातील संतप्त रेशन दुकानदारांनी जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी यांना हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे. परिणामी हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर जिल्ह्यातील रेशन दुकानदार हे रेशन वाटप करणार नाहीत असा इशारा रेशन दुकानदारांकडून देण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत फक्त २० टक्के लोकांनाच आनंदाचा शिधा मिळालेला आहे. त्यामुळे बहुतेक वेळा रेशनिंग दुकानांत ग्राहक हे रेशनिंग दुकानदारासोबत वाद घालताना दिसून येतात.