उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. ते अमित शाह यांना भेटणार आहेत. एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार निश्चित झाला असून त्यासाठीच ते दिल्लीला गेल्याची चर्चा आहे. अशातच आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी एक तर्कट मांडले आहे. जेव्हा दिल्लीच्या वाऱ्या वाढतात, तेव्हा मंत्र्यांच्या नावांच्या याद्या फायनल होत आल्याचे समजायचे असते अशा शब्दांत संभाव्य मंत्रीमंडळ विस्तारावर केसरकर यांनी भाष्य केले आहे. दुसऱ्या बाजूला सुधीर मुनंगटीवार यांनीही मंत्रीमंडळ विस्ताराविषयी महत्वाची माहिती दिली आहे.
मंत्रीमंडळाचा विस्तार येत्या १५ ऑगस्टच्या अगोदर पूर्ण करावाच लागेल. स्वातंत्र्य दिनाचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे झेंडावंदन करण्याची जबाबदारी लक्षात घेता मंत्रीमंडळाचा विस्तार अपरिहार्य आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, येत्या रविवारी म्हणजे ७ ऑगस्ट रोजी मंत्रीमंडळाचा शपथविधी करण्याच्या हालचाली सुरू होत्या. परंतु सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सोमवारपर्यंत लांबणीवर गेली आहे. ती आणखी काही दिवस लांबणीवर जावू शकते. त्यामुळे मंत्रीमंडळाचा मुहूर्त 7 ऑगस्टवरून 14 ऑगस्टपर्यंत लांबणीवर जावू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
एकनाथ शिंदे सरकारला सत्तेत येवून एक महिना उलटला तरी मंत्रीमंडळाचा विस्तार होत नाही. शिवसेनेतील इच्छूक आमदार वैतागले आहेत. विशेषतः हातातील मंत्रीपद सोडून शिंदेंसोबत आलेले आमदार हातघाईवर आले आहेत. न्यायालयीन पेच निर्माण झाला तर ‘तेल गेले तुप गेले, हाती धुपाटणे राहिले’ अशी अवस्था होईल, याची भिती इच्छूक मंत्र्यांना वाटू लागली आहे.
हे सुद्धा वाचा
Deepak Kesarkar : संत दीपक केसरकर ठाणे हृदयसम्राट एकनाथ शिंदेंना भेटले
Aaditya Thackeray यांच्या सभांमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली
15 जणांना मिळू शकतात मंत्रीपदे
मंत्रीमंडळ विस्तार करण्याचा दबाव शिंदे सरकारवर वाढत चालला आहे. त्यामुळे येत्या रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात शिंदे गट व भाजप अशा दोन्ही पक्षांना 50:50 या प्रमाणात मंत्रीपदे मिळतील, अशी शक्यता आहे. त्यानुसार दोन्ही गटांना प्रत्येकी आठ मंत्रीपदे मिळतील, असे बोलले जात आहे.
मंत्र्यांचा छोटेखानी शपथविधी सोहळा राजभवनवर होईल. उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या माजी मंत्र्यांना प्राधान्याने मंत्रीमंडळात स्थान दिले जाईल. यात अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, उदय सामंत आदींचा समावेश असेल. भाजपच्या गटातून आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, राम शिंदे यांच्यासह काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश असू शकेल असे बोलले जात आहे.