केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजना आणि राज्य सरकारच्या नमो महासन्मान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक विशेष मोहीम राबवली होती. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेचा पुढील हप्ता तसेच राज्य सरकारच्या नमो महासन्मान योजनेचा पहिला हप्ता देण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तसेच इतर अटींची पूर्तता करण्याबाबत ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेद्वारे राज्यातील 13 लाख 45 हजार शेतकरी पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र ठरले आहेत.
धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर स्वतः पुढाकार घेऊन राज्यातील 13 लाख 45 हजार शेतकरी योजनांच्या लाभास पात्र करवून घेतले आहेत. मुंडे यांनी कृषी, महसूल, भूमी अभिलेख आदी विभागांशी समन्वय साधून ई-केवायसी पूर्ण करणे, भूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करणे, आधार बँक खात्याशी संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता करून घेत लाखों शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यात मदत केली.
प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पी एम किसान योजना व राज्य शासनाची नमो किसान महासन्मान योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी व अन्य अटींची पूर्तता करणे अनिवार्य करण्यात आल्याने राज्यातील लाखो पात्र लाभार्थी वंचित राहतील, अशी परिस्थिती… pic.twitter.com/mV8GDQQSsf
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 25, 2023
प्रधानमंत्री किसान योजना जेव्हा नव्याने सुरू करण्यात आली त्यावेळी राज्यातील सुमारे 1 कोटी 19 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती. त्यांपैकी सुमारे 95 लाख शेतकरी पात्र ठरले. मात्र वरील अटींची पूर्तता न केल्याने 13 व्या आणि 14 व्या हप्त्यात त्यापैकी 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना पी एम किसानचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. 15 व्या हप्त्यासाठी ई-केवायसीची अट आता अनिवार्य करण्यात आली आहे.
मुळात 95 लाख पैकी 92.87 लाख शेतकरी पात्र ठरत आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना मयत, कर भरणारे व इतर कारणांनी रद्द करण्यात आले आहे. पत्र शेतकऱ्यांपैकी 82.59 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झालेले होते.
धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून कृषी विभागाने विशेष मोहीम हाती घेतल्यानंतर सुमारे 13 लाख 45 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण करणे, बँक खाते संलग्न करणे, भूमिअभिलेख नोंदी पूर्ण करून अद्ययावत करून घेणे या अटींची पूर्तता करून घेतली. यामध्ये 9.58 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे, 2.58 लाख शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न करणे, 1.29 लाख शेतकऱ्यांचे भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे बाबत कामकाज पूर्ण झाले आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी सातत्याने विभागाच्या बैठका घेऊन वारंवार आढावा घेतल्याने या कामाला आणखीनच गती प्राप्त झाली.
हे ही वाचा
गिरीश महाजनांच्या फोननंतरही जरांगेंचं उपोषण सुरूच
50 खोक्यांचे आरोप करणाऱ्यांनीच 50 कोटींची मागणी केली; मुख्यमंत्री शिंदे यांचा गौप्यस्फोट
मराठ्यांना आरक्षण देणारच -एकनाथ शिंदेंचा निर्धार; भर भाषणात मंच सोडून शिवरायांची शपथ
दरम्यान राज्य शासनाने घोषित केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपये प्रमाणे पहिल्या हप्त्याचे गुरुवारी (26 ऑक्टोबर) शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर वितरण करण्यात येणार असून यासाठी कृषी विभागाने 1720 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.