मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार दोन महिन्यांपूर्वी सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावला. निव्वळ राजकीय दृष्टीकोन ठेऊन निर्णय रद्द करण्याच्या नादात मुख्यमंत्री शिंदे यांनी फार मोठी चूक केली. त्यांच्या या चुकीमुळे महाराष्ट्रातील एका मागास, वंचित व दुष्काळी भागाचे नुकसान होऊ घातले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात या भागात प्रचंड मोठी संतापाची लाट उसळली आहे. शिंदे यांच्या विरोधात या भागातील जनता एकवटली आहे. शेतकरी, व्यावसायिक, विचारवंत, पत्रकार अशा मंडळींनी एकत्र येऊन आता शिंदे यांचा हा निर्णय हाणून पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातच त्यांच्या विरोधात मोठी चळवळ सुरू झाली आहे. ही चळवळ उग्र रूप धारण करू लागली आहे. संतप्त जनतेने आंदोलनाची पहिली हाक दिली आहे. चुकीचा निर्णय रद्द करावा, अशी संतप्त जनतेची मागणी आहे. शिंदे यांच्या निर्णयाविरोधातील हा उठाव माणदेशी लोकांकडून होऊ घातला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक मोठा औद्योगिक प्रकल्प सातारा जिल्ह्यातील म्हसवड (गारवाड वगैरे) परिसरात होऊ घातला आहे. या प्रकल्पाचा फायदा माणदेश म्हणून लौकीक असलेल्या पाच – सहा तालुक्यांना होणार आहे. या परिसराचे वैशिष्ट्य म्हणजे हा भाग कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो.
हे सुद्धा वाचा…
BJP : भाजपच्या ‘मिशन लोटस’ विरोधात ‘हे’ नेते उतरले रणांगणात
Arshdeep Singh : ‘तो’ झेल अर्शदीप सिंगला पडला महागात
Suresh Raina Retirement: सुरेश रैना आंतरराष्ट्रीय तसेच आयपील क्रिकेटमधून निवृत्त
हा संभाव्य प्रकल्प माणदेशी माणसांचे कल्याण साधणारा आहे. भविष्यात तब्बल 3 लाख कोटी रूपयांची उलाढाल करणारा हा प्रकल्प ठरणार आहे. जगभरातील मोठ मोठे उद्योग येथे येणार आहेत. विमानतळ, रेल्वे स्थानके निर्माण होणार आहेत.
त्यामुळे वर्षानुवर्षे पिचलेल्या माणदेशी जनतेलाही प्रगती साधण्याची संधी मिळणार आहे. केंद्र सरकारमार्फत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिसूचना सुद्धा जारी झाली आहे. त्याची राजपत्रात नोंद झाली आहे. त्यासाठी साधारण 4 हजार एकर एवढी जमीन अधिगृहीत करण्याचा निर्णय झालेला आहे. जमीन ताब्यात घेण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने 20 जुलै 2022 रोजी आदेश जारी केला होता. पण त्यानंतर काहीच दिवसांत महाविकास आघाडी सरकार कोसळले.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले. एकनाथ शिंदे यांनी एका फटक्यात म्हसवड येथे होऊ घातलेला प्रकल्प रद्द केला. तो अन्यत्र हलविण्याचा तत्वतः निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे असा काहीतरी चुकीचा निर्णय घेतील, असे माणदेशी जनतेच्या स्वप्नातही नव्हते. त्यामुळे अनपेक्षित झालेल्या या निर्णयाविरोधात जनतेमधून संताप व्यक्त होऊ लागला. त्यातूनच मोठी लोकचळवळ सुरू होऊ घातली आहे.