महिलांसाठी असलेल्या कायद्यांचा राजकीय हत्यार म्हणून वापर करायचा असा धोरणात्मक निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे की काय, अशी म्हणायची वेळ आली आहे. कारण महिलेला पुढे करून पुरूष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर (FIR against NCP activist) विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची नवी घटना समोर आली आहे. भाजपच्या आमदाराने फूस लावल्याने एका महिलेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यकर्त्यावर खोटा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी एफआयआर दाखल करून संबंधित आरोपी कार्यकर्त्याला जेरबंद केले. परंतु या कार्यकर्त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्वरीत जामीन मंजूर केला. न्यायालयाने ‘सत्य’ बाजू उचलून धरल्यामुळे या कारवाईतील दुबळेपणा समोर आला आहे.
गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर सुद्धा एका महिलेने अशाच पद्धतीने खोटा गुन्हा दाखल केला होता. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून संबंधित महिलेला धक्काबूकी झाली होती. पण या प्रकाराला वेगळे वळण देवून आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे सुद्धा वाचा
Jaykumar Gore : जयकुमार गोरे होणार जलसंपदा खात्याचे मंत्री!
भाजप आमदार जयकुमार गोरेंवर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल
प्रभाकर देशमुखांचा जयकुमार गोरेंवर तीक्ष्ण वार !
नव्या घटनेत सुद्धा याच प्रकाराची तंतोतंत पुनरावृत्ती झाली आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी असलेले अमोल काटकर व त्यांचे बंधू अजित काटकर (राहणार किरकसाल) अशा दोघांवर दहिवडी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
ज्या महिलेने हा खोटा गुन्हा दाखल केला, त्या महिलेचे कुटुंब भाजप आमदार जयकुमार गोरे यांचे पाठीराखे आहेत. अमोल काटकर व तक्रारदार महिला यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून धक्काबूकी झाली. पण तक्रारदार महिलेने या प्रकाराला वेगळे वळण दिले. ‘छातीला धक्का लावला. त्यामुळे मनात लज्जा निर्माण झाली’ असा आरोप संबंधित महिलेने केला. या आरोपामुळे अमोल काटकर व त्यांच्या भावांवर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
अमोल काटकर व त्यांच्या भावाविरोधात खोटा गुन्हा दाखल व्हावा म्हणून आमदार जयकुमार गोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दबाव आणला होता. राजकीय दबावापुढे झुकून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याची चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू आहे.
सामाजिक कार्याला वाहून घेतलेले अमोल काटकर
अमोल काटकर हे राजकीय क्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतलेले आहे. किरकसाल या गावाच्या चौफेर प्रगतीसाठी त्यांनी अनेक कल्पक उपक्रम राबविले आहेत. शेती, जलसंधारण, शिक्षण, पर्यावरण, पक्षीप्रेम, व्याख्यानमाला असे सामाजिक उपक्रम राबवून ते गावातील लोकांची प्रगती साधण्यासाठी सतत प्रयत्नशिल असतात. त्यांच्या अशा कल्पक उपक्रमाची तालुक्यात नेहमीच चर्चा असते. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर काटकर यांची बदनामी होण्याऐवजी त्यांच्या सामाजिक कार्याविषयी व शुद्ध चारित्र्याविषय़ी जनमाणसांतून चर्चा होवू लागली.
भाजप आमदार ठरतोय अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी
राज्यात शिवसेना – भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर स्थानिक आमदार जयकुमार गोरे यांनी अधिकारी वर्गामध्ये आपली दहशत निर्माण केली आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या ताटाखालचे मांजर बनूनच काम करायला हवे अशा पद्धतीने जयकुमार गोरेंनी दहशत निर्माण केली आहे. जो अधिकारी आपले ऐकत नाही त्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यासाठी गोरे मंत्रालयातून फिल्डींग लावतात. जयकुमार गोरे यांच्या या दहशतीमुळे तालुक्यातील अधिकारी वर्ग पुरता घाबरून गेलेला आहे. जयकुमार गोरेंची वक्रदृष्टी नको या भितीपोटीच दहिवडी पोलिसांनी अमोल काटकर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे बोलले जात आहे.