सध्या 2022 हे साल संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे 2023 या नव्या वर्षाचे स्वागत करण्याच्या तयारीला जोर आला आहे. नविन वर्षात आपल्या घरासाठी प्रत्येकजण काही ना काही नविन गोष्ट खरेदी करत असतो. मात्र, यावेळी प्रत्येक घरात एक गोष्ट समान खरेदी केली जाते ती म्हणजे वार्षिक दिनदर्शिका. यावेळी सुद्धा डिसेंबर महिन्यात दिनदर्शिकेच्या खपाला जोर आला आहे. पण अशातंच गेल्या अनेक वर्षांपासून अचूक माहितीच्या विश्वासार्हतेवर आपले नाव कमावणारी कालनिर्णय दिनदर्शिका चर्चेत आली आहे. यावेळी या वार्षिक दिनदर्शिकेच्या अंकात एक चुक झाली आहे. त्या चुकीमुळे सध्या कालनिर्णय दिनदर्शिकेवर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.
16 जानेवारी हा दिवस स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाने शंभुराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते. याच दिवसाचा उल्लेख कालनिर्णय दिनदर्शिका 2023 मध्ये करण्यात आलेला नाही. त्यामुळे कालनिर्णय कडून झालेल्या या चुकीवर अनेक शिवभक्तांनी आक्षेप घेतला आहे. त्यानंतर कालनिर्णयच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत एक निवेजदन जारी करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा
भारत-पाकिस्तान सामन्याने आमचं आयुष्य बदलून टाकलं; मोहम्मद रिजवानने सांगितली आठवण
थंडीच्या वातावरणातही गाल गुलाबी ठेवण्याचे रहस्य जाणून घ्या एका क्लिकवर
एकनाथ शिंदेंनी राजकीय सभेसाठी उधळले 10 कोटी, प्रकरण न्यायालयात!
‘कालनिर्णय 2023च्या आवृत्तीमध्ये 16 जानेवारी रोजी असणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचा उल्लेख करण्याचे राहून गेले आहे. यापुढील कालनिर्णयच्या उर्वरित सर्व प्रतींमध्ये तसेच यापुढील सर्व आवृत्त्यांमध्ये हा उल्लेख केला जाईल. धर्मवीर छत्रपती संभआजी महाराज यांच्याविषयी आम्हाला अतीव आदर आहे. छत्रपती संभाजी महाराजप्रेमींच्या भावना अनवधानाने दुखाव्या गेल्या असल्यास आम्ही मनापासून दिलगीर आहोत.’ असे निवेदन या पोस्ट मार्फत करण्यात आले आहे.
— Kalnirnay (@Kalnirnay) December 15, 2022
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांच्या अपमानांचे सत्र सुरू आहे. त्यामुळे आधीच अनेक शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत कालनिर्णय कडून झालेल्या या चुकीवरून अनेक शिवभक्तांनी दिनदर्शिका बनवणाऱ्यांना धारेवर धरले आहे. कालनिर्णयने जारी केलेल्या निवेदनाखाली देखील अनेकांनी तीव्र शब्दांच्या कमेंट्स लिहीत या गोष्टीचा निषेध केला आहे. विशेष म्हणजे अनेक लोकांकडून ज्या आवृत्तींमध्ये ही चुक झाली आहे त्या आवृत्तींच्या विक्रीवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या नव्या वादामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.