श्रावण महिना सुरू झाला की महाराष्ट्रात विविध सणांची रेलचेल सुरू होते. राज्यातील विविध ठिकाणी श्रावण महिन्याचे महत्त्व आणि त्यातील परंपरा नित्यनियमाने पाळण्यात येतात. खानदेशात सुद्धा श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. येथील सण समारंभाचे महत्त्व सुद्धा तितकेच मोठे आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीचा सण झाला की येणाऱ्या पहिल्या रविवारी घरोघरी कानुमातेची स्थापना होते. कानुमातेचा सण (Kanubai Festival) खानदेशात मोठा मानला जातो. कोणी कानुमाता म्हणतं, तर कोणी कानबाई म्हणणे पसंत करते, कानुमातेच्या रोटला सुद्धा यावेळी विशेष महत्व असते. गेल्या दोन वर्षांत कोरोना संकटामुळे कानुमातेचा उत्सवावर निर्बंध होते, परंतु यंदा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
या सणाला वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणारे चाकरमानी कानुबाई मातेच्या उत्सवाला आवर्जून जातात. श्रावणात येणाऱ्या नागपंचमी नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी घरोघरी कानुबाई मातेची स्थापना होते. रविवारी सायंकाळी उशीरा स्थापना झाल्यानंतर देवीची विधिवत पूजा – आरती होते. त्यानंतर रात्रभर देवीसमोर पूजा -पाठ होते. रात्रभर देवीसमोर चालणाऱ्या पूजा – पाठ सोबत कोणी भाविक डुबली वाद्यावर देवीचे गाणे म्हणतात. यावेळी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फुटाणे, लाह्यांचा प्रसाद देण्यात येतो, तर देवीला पुरण पोळी, खीर, भात, आमटी तसेच भाज्यांचा नैवेद्य सुद्धा दाखवण्यात येतो.
हे सुद्धा वाचा
Ganpatrao Deshmukh : विधानसभेचे विद्यापीठ !
VIDEO : किरीट सोमय्यांचे पुढचे लक्ष्य अस्लम शेख
VIDEO: IIT शुल्कवाढी विरोध विद्यार्थ्यांचे उपोषण, राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार
दुसऱ्या दिवशी सकाळी कानुमातेला दही, भाताचा नैवेद्य दाखवून, आरती झाल्यानंतर दुपारी उशिरा पर्यंत कोणी नदीवर, तर कोणी घरीच कानुमातेचं वाजत गाजत विसर्जन करतात. दरम्यान, कानुमातेच्या स्थापनेच्या एक दिवस अगोदर सकाळी घरातील पुरुष – महिला रोट साठी असलेले गहू देवीसमोर, देवासमोर ठेवून त्याची विधिवत पूजा करून तदनंतर दळून आणतात. हे दळून आणलेलं पीठ साधारण आठ ते पंधरा दिवसाच्या आत घरातील सदस्य संख्येनुसार पूर्ण करण्यात येते. कानुमातेचं रोट म्हणजे जे पीठ पूजा करून दळून आणलेलं असतं ते पीठ साधारण पंधरा दिवसात म्हणजे पौर्णिमेपर्यंत संपवावे लागले.
काही वेळा पौर्णिमा काही दिवसांवर असते म्हणजे अवघ्या चार – पाच दिवसावर असल्यास घरातील वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यानुसार रोट पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात येते. या कानुमातेच्या उत्सवात भाऊबंदकी एकत्र येते. सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीत या उत्सवाच्या निमित्ताने भाऊबंदकी एकत्र येण्याची परंपरा आवर्जून पाळली जाते. यंदा कोरोनाचे संकट काहीसे कमी झाल्याने यंदा सगळेच सण उत्साहात साजरे करण्यात येत आहेत. निर्बंध नसल्याने कानुमातेच्या उत्सवासाठी सुद्धा भाविकांचा उत्साह दिसून येत आहे.