टीम लय भारी
सातारा : सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखानामधील कामगारांचे आंदोलन करत आहेत. मागील २२ महिन्यांपासून कामगारांना पगार न मिळाल्याने त्यांनी कारखान्याचे गेट समाेर ठिय्या आंदाेलनाची सुरुवात केली आहे. या आंदाेलनात सुमारे ४०० पेक्षा अधिक कामगार सहभागी झाले आहेत.
भुईंज येथील हा कारखाना गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे यावर्षी गाळप सुद्धा हाेऊ शकलेले नाही. परिणामी या कारखान्यातील कामगारांना गेल्या बावीस महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.त्यामुळे कामगारांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारा बाहेर आक्रोश आंदोलन सुरू केले आहे. या आंदाेलनात सुमारे ४०० कामगार सहभागी झाले आहेत.
यावेळी कारखान्यातील ज्येष्ठ कामगार म्हणाले माजी आमदार आणि विद्यमान अध्यक्ष मदन भाेसले आजही हा कारखाना चालावा यासाठी आणि आमच्यासाठी प्रयत्न करीत आहेत हे आम्हांला माहिती आहे. परंतु आमची सहनशिलता संपली आहे. वाढत्या महागाईमुळे आमचे कुटुंब आता त्रस्त झाले आहे. त्यामुळे आज कारखान्यासमाेर आंदाेलन छेडावे लागले आहे.