नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चता फिसकटली. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात नारायण राणे कुटुंबियांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खोटे आरोप केले. अशा शब्दांत एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राणे कुटुंबाचा समाचार घेतला आहे. केसरकर यांच्या या आरोपांना उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आज पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. दीपक केसरकर यांच्या या आरोपांना नितेश राणे उत्तर देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सुशांतसिंग प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर नितेश राणे व निलेश राणे यांनी बेछूट आरोप केले होते. दिशा सालियन हिच्या आत्महत्येचाही संदर्भ आदित्य ठाकरे यांच्याशी जोडून टाकला होता. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाची सीबीआयनेही चौकशी केली होती. त्यात राणे कुटुंबांचे आरोप सिद्ध होतील असा कोणताही पुरावा मिळाला नव्हता.
हे सुद्धा वाचा
Nilesh Rane : उरलेले फक्त चटई, खुर्च्या उचला… निलेश राणेंकडून शिवसैनिकांसाठी सूचक वक्तव्य
या पार्श्वभूमीवर राणे कुटुंबाला अडचणीत आणणारा आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे. केसरकर व राणे कुटुंब यांच्यामधून विस्तवही जात नाही. आतापर्यंत केसरकर व राणे कुटुंबिया वेगवेगळ्या पक्षात कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्याकडून केले जाणारे आरोप एकमेकांच्या पक्षांच्या धोरणांशी सुसंगत होते.
परंतु नारायण राणे कुटुंब भाजपमध्ये कार्यरत आहे. तर एकनाथ शिंदे गटाने आता भाजपसोबत सलगी केली आहे. दीपक केसरकर हे एकनाथ गटाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी राणे यांच्यावर उघडपणे तोफ डागली आहे. त्यामुळे शिंदे गट व भाजप यांच्यातील संबंध सुद्धा भविष्यात ताणले जावू शकतील असे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे सरकारच्या संभाव्य मंत्रीमंडळामध्ये नितेश राणे यांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण नितेश राणे यांना मंत्रीपद मिळू नये यासाठी दीपक केसरकर प्रयत्नशील आहेत. त्या अनुषंगानेच केसरकर यांनी राणे कुटुंबांवर आरोप केले असल्याचे बोलले जात आहे.
केसरकर व राणे कुटुंबांचे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील राजकारणावर वर्चस्व आहे. केसरकर व राणे हे दोघेही एकमेकांची हाडवैरी आहेत. त्यांच्यातून विस्तवही जात नाही. आता हे दोघेही भाजप व भाजपसोबतच्या शिंदे गटात आले आहेत. परंतु जिल्ह्यातील हाडवैर त्यांनी राज्याच्या पातळीवर मांडायला सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे हे आजच्या पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.