कोकणाला ७२० कि मी चा समुद्र किनारा लाभला असताना, रिफायनरीच्या सावटामुळे बारसू सह कोकणातील शेतकरी, मासेमारी करणारे हवालदिल असतानाच, कोकणात एलईडी फिशिंगमुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आलेले आहे. ही अशाच पद्धतीने मासेमारी चालू राहिल्यास कोकणातील मासे गायब होतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ही मासेमारी थांबवण्याची मागणी आता जोर धरत आहे.
१५ दिवसापूर्वी गावाला, देवबागला गेलो होतो. रोज रात्री समुद्र किनारी बसून लाटांचा आवाज ऐकणे म्हणजे एक पर्वणीच. दूर समुद्रात कुठे तरी स्थानिक मच्छीमार आपली होडी घेऊन गेलेले असताना त्यांच्या होडी वर led चा टिमटिमणारा बल्ब त्याचा प्रकाश मनाला मोहून टाकत होता. यावेळी मात्र त्या टिमटिमणाऱ्या प्रकाशाच्याही मागे एक वेगळाच पांढरा शुभ्र, अगदी दूर पाण्यात हॅलोजन लाईट लावल्यासारखे ४-५ ठिकाणी प्रकाशझोत दिसत होते. अनेकांना विचारलं हा उजेड कसला दिसतोय. पण बहुतेक कोणाला माहीत नव्हते. ४-५ दिवस अनेकांकडून त्या प्रकाशाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, पण काही समजले नाही.
शेवटी काही स्थानिक मच्छीमार मित्रांना विचारले आणि वेगळीच माहिती मिळाली. ४-५ धनाढ्य (कदाचित राजकीय संबंधित) लोकांच्या मोठ्या ट्रॉलर विजेच्या उपकरणा सहित (भरपूर बॅटरी बॅक अप) घेऊन दूर समुद्रात जातात. ट्रॉलर वरून एक मोठा, अत्यंत प्रखर प्रकाशाच्या ताकदीचा LED खालून पाण्यात खोलवर सोडलेला असतो…. त्या ४-५ बोटी एक ठराविक अंतर ठेऊन उभ्या राहतात आणि LED लाईट सुरू करतात.
किनाऱ्यावरून पहिलं समुद्राच्या गर्भातून वर येणारा प्रकाशाचा एक मोठा झोत दिसत असतो. त्या प्रकाशाकडे आकर्षित होऊन आजूबाजूच्या कित्येक किलोमीटर परिघ क्षेत्रातील छोटे मोठे सर्व प्रकारचे मासे जवळ येतात. त्या ट्रॉलरच्या चारही बाजूने इतर बोटी बारीक जाळे अश्याप्रकारे पसरवतात की ज्यात हे सर्व मासे अडकतात. एका रात्रीत ४-५ प्रकाशित ट्रॉलरमुळे साधारण लाखो करोडोचे मासे पकडले जातात, ज्यात अगदी कापी एवढे पापलेट म्हणा किंवा बांगड्या पेक्षा लहान सुरमई देखील त्यात अडकतात.
बरं हे ट्रॉलर समुद्र किनाऱ्यापासून एवढे दूर असतात की स्थानिक मच्छीमार तिथंपर्यंत जाऊ शकत नाही, अथवा गेले तरी त्यांना तिथून हाकलण्यात येते. दूर समुद्रकिनारी अश्या प्रकारे मासे पकडल्यामुळे स्थानिकांच्या बोटींना काही मासे सापडत नाहीत…. वास्तविक या LED लायटिंग फिशिंगला सरकारतर्फे बंदी आहे. पण पैसा आणि इतर धनाढ्य (राजकीय) लोकांचे सहकार्य लाभलेले असल्या शिवाय एवढी मोठी तस्करी शक्य नाही. आज असे म्हटले जाते समुद्रात मासेच नाहीत त्यामुळे बाजारात पुरवठा कमी होतो आणि मग बाजारात भाव वाढले जातात आणि त्याचा परिणाम म्हणून रिसॉर्ट / होम स्टे वाल्यांना माश्याचे भाव वाढवावे लागतात.
हे सुद्धा वाचा
तंबाखूची तल्लफ थांबवा, अन्यथा जीव गमवा; देशात दरवर्षी होतात 10 लाखांहून अधिक मृत्यू
लग्नसराई जोरात; ठाण्यातील विवाह नोंदणी कार्यालयात पाच महिन्यात२२०५ नोंदणी अर्ज
गुड न्यूज | मान्सून 8 ते 10 जूनपर्यंत मुंबई, कोकणात पोहोचणार
एकीकडे रिफायनरीचे सावट असताना अश्या प्रकारे LED लायटिंग फिशिंग मुळे स्थानिक मच्छीमार अडचणीत येत आहे. उद्या त्यांना मासेच मिळाले नाहीत तर आपला उदरनिर्वाह कसा करणार. या बाबी कडे लक्ष तरी कोणाचे आहे का, की माहीत असून मूग गिळून गप्प बसले आहेत सर्व? जाणत्या लोकांनी, पत्रकारांनी या गोष्टीचा अभ्यास करून या विषयावर उजेड टाकावा अशी विनंती करणारी मालवण देवबागमधील अरीन टिकम यांची समाज माध्यमातील पोस्ट भलतीच लोकप्रिय झाली आहे.