मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आज ‘लय भारी’च्या पहिल्या वाहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन पार पडले. ‘देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. या स्वातंत्र्याबरोबरच राजकारणाच्याही ७५ वर्षाला विशेष महत्व आहे. त्या पार्श्वभूमीवर दिवाळी अंकासाठी ‘राजकारण @75’ ही संकल्पनाच फार प्रभावी आहे, अशा भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी संपूर्ण अंक उघडून पाहिला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या लेखाविषयी त्यांनी कुतूहल व्यक्त केले. अंकातील सर्व लेखकांची नावे पाहिली. हा अंक मी घरी घेवून जाणार आहे, आणि तो निवांतपणे वाचणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
‘लय भारी’ मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. परंतु दिवाळी अंक हा मराठी संस्कृती व परंपरेचा अविभाज्य घटक आहे. त्या अनुषंगाने आम्ही हा अंक प्रसिद्ध केला असल्याचे ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
‘लय भारी’चा हा पहिलाच दिवाळी अंक आहे. तरी सुद्धा अत्यंत दर्जेदार अंक काढला असल्याची प्रशंसा मुख्यमंत्र्यांनी केली. देशातील ७५ वर्षात झालेली राजकीय स्थित्यंतरे विविध लेखकांनी टिपली आहेत. देशाला आकार देताना मैलाचा दगड ठरणाऱ्या अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. अनेक घडामोडी विस्मृतीत सुद्धा गेल्या आहेत. ‘लय भारी’च्या दिवाळी अंकाच्या माध्यमातून अशा घडामोडी पुन्हा वाचायला मिळतील. त्यामुळे हा अंक मी घरी नेऊन वाचणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘लय भारी’चा हा दिवाळी अंक राजकारणात कार्यरत असलेल्या व राजकारणात येवू इच्छिणाऱ्यांसाठी एक अभ्यास पुस्तक ठरेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
विशेष म्हणजे, गुरूवारी मंत्रिमंडळाची बैठक होती. त्यानंतर एका मागोमाग एक अशा अनेक महत्वाच्या बैठकांचा सपाटा सुरू होता. असे असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ काढून ‘लय भारी’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन केले. या अंकात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेख लिहिलेला आहे. परंतु माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व इतर लेखकांनी लिहिलेल्या लेखांविषयी मुख्यमंत्र्यांनी कुतूहल व्यक्त केले.
दरम्यान, ‘लय भारी’चा हा दिवाळी अंक शुक्रवारपासून मुंबई व पुण्यात वितरीत होणार आहे. राज्यभरातील प्रमुख पुस्तक दुकानांमध्येही लवकरच दिवाळी अंक वितरीत करण्याचे नियोजन आहे. मंत्रालयानजिक आकाशवाणी आमदार निवास येथील पुस्तकाच्या दुकानांमध्येही हा अंक उपलब्ध करण्यात येणार आहे. वाचकांनी आपल्या नजिकच्या दुकानात अंकाची मागणी करावी. दुकानांमध्ये अंक नसेल तर अंकासाठी आग्रह करावा. त्या दुकानांमध्ये लगेचच अंक पाठविण्याची व्यवस्था केली जाईल, असे ‘लय भारी’च्या व्यवस्थापनाकडून आवाहन करण्यात आले आहे. अंकाच्या नोंदणीसाठी 7045513110 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. या दिवाळी अंकात मातब्बर अशा २५ मान्यवरांनी लेख लिहिले आहेत.
लेखकांची नावे
राजकीय नेते : एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अब्दुल सत्तार, आशीष शेलार, अतुल भातखळकर, डॉ. मनीषा कायंदे, सदाभाऊ खोत, हर्षल प्रधान, सक्षणा सलगर. निवृत्त IAS : प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी. संपादक / ज्येष्ठ पत्रकार : संजय आवटे, राहि भिडे, नंदकुमार सुतार, विजय चोरमारे, प्रफुल्ल फडके, जयंत महाजन, भारत कदम, भागा वरकडे. सामाजिक कार्यकर्ते : विश्वास काश्यप, संदेश पवार, आणि ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात.