टीम लय भारी
मुंबई : शिवसेनातील गळती काही थांबण्याचे नाव घेईना. आमदार, खासदार, नगरसेवक, शिवसैनिक आणि अगदी शिवसेनेतील जुने – जाणते नेतेमंडळी सुद्धा शिंदे गटाची पाठराखण करीत असल्याचे दिसून येत आहे. काल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर टीका करीत आपला राजीनामा दिला आणि शिंदे गटाला पाठींबा दर्शवला. दरम्यान, शिवसेना कार्यालयातून त्यांची हकालपट्टीच केल्याचे पत्र माध्यमांमध्ये व्हायरल झाले. त्यामुळे नेमकी ही हकालपट्टी की राजीनामा हा आता पेच निर्माण झाला आहे.
शिवसेना नेते श्री. रामदास कदम व श्री. आनंदराव अडसूळ यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माननीय शिवसेनापक्षप्रमुख श्री. उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. pic.twitter.com/pSNgBD9Cj8
— Shivsena Communication (@ShivsenaComms) July 18, 2022
शिवसेना नेते रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशा आशयाचे पत्र काल संध्याकाळी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात आले.
तत्पुर्वी, शिवसेनेचे जुनेजाणते नेते म्हणून ओळख असणारे रामदास कदम यांनी काल दुपारी राजीनाम्याचे पत्रच सोशल मिडीयावर पोस्ट केले. त्यामध्ये शिवसेना का सोडत असल्याचे वर्णन करीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षनेते पदाला किंमत राहिली नाही असे म्हणून त्यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली.
दरम्यान कदम यांच्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी सुद्धा शिंदे गटात जाण्यातच धन्यता मानली. या संपुर्ण घडामोडींमध्ये खरे कोण खोटे कोण हा सवाल यानिमित्ताने समोर येऊ लागला आहे. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाला राजीनामा नाट्य म्हणायचे की सपशेल हकालपट्टी हे आता सांगणे अवघडच म्हणावे लागेल अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून उमटू लागल्या आहेत.
हे सुद्धा वाचा…
एसटी बस दुर्घटना अपडेट, 12 जणांवर शोकाकूल वातावरणात आज होणार अंत्यसंस्कार
VIDEO : सामान्यांना संकटात टाकण्याचा नवा डावपेच
VIDEO : काय सांगता…? पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे फोटो फेकले कचऱ्यात