लय भारी टीमचा स्पेशल रिपोर्ट
महाराष्ट्रात चाललेय तरी काय, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. कारण सहा महिन्यांत सहा मोठ्या दुर्घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. दुर्घटना घडल्या की चौकशीसाठी सरकार लगेचच चौकशी समिती नेमते. या समित्या केवळ दुर्घटनांसाठीच नाही तर काही प्रकरणांची चौकशी करणे, श्वेतपत्रिका काढण्यासाठीही नियुक्त केल्या जातात. समितीच्या अहवालानंतर त्यांनी ज्या शिफारसी केल्यात त्यांचा विचार केला जातो. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात वेगवेगळ्या कारणांसाठी तब्बल 265 पेक्षा जास्त समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मग या समित्या करतात काय? त्यांचा अहवाल कधी येणार? ज्या समितींचे अहवाल आलेत त्या अहवालांवर सरकारने काय कार्यवाही केली आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्रातील जनतेला मिळाली पाहिजेत. सर्वसामान्यांचे सरकार म्हणता मग या शेकडो समित्यांच्या अहवालांचे काय झाले, याचे उत्तर सरकारने द्यायला हवे.
महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटना

16 एप्रिल 2023. राज्य सरकारच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात तब्बल 14 जणांचा बळी गेला. या कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अनेक मंत्री तसेच आमदार होते. या दुर्घटनेचे राज्यात आणि केंद्रातही पडसाद उमटले. दुर्घटनेनंतर दोन दिवसांत चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. समितीला अहवालासाठी एक महिन्याचा अवधी देण्यात आला. सनदी अधिकारी नितीन करीर यांच्या समितीचे कामही सुरू झाले. पण आता साडेपाच महिने झाले तर अहवाल जनतेसमोर सादर झालेला नाही, हे वास्तव आहे.
समृद्धी महामार्गावरील भीषण अपघात

1 जुलै 2023. समृद्धी महामार्गावर बुलढाण्यावर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 7 जण गंभीर जखमी झाले होते. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून त्यावर अपघातांची मालिका सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही चाचपणी न करता केवळ श्रेयासाठी घाईघाईने समृद्धी महामार्ग खुला केल्याने अपघात घडल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. समृद्धी महामार्गाला ‘संमोहन मार्ग’ म्हटले जाते. या महामार्गावरील अपघातांची कारणे नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या विद्यार्थ्यानी शोधली होती. पण सरकारने त्यावर कार्यवाही केली का, महत्त्वाचा प्रश्न आहे.
इर्शाळवाडीवर दरड कोसळली

19 जुलै 2023. ती बुधवारची रात्र होती. रात्री साडेअकराच्या सुमारात रायगड जिल्ह्यातील चौक जवळील इर्शाळवाडीवर दरड कोसळली. इर्शाळवाडीतील 26 लोकांचा दरडीखाली मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह काढण्यात आले. तर 23 जुलैला शोधकार्य थांबवलं तेव्हा 81 लोक बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता.
हे ही वाचा
राजकीय आंदोलनापूर्वी अधिकाऱ्यांची जात तपासायची का?- भाजपा प्रवक्ता अजित चव्हाणांचा सवाल
अजितदादांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणविसांचा वाजविला ‘बँड’ !
समीर भुजबळ यांनी नवाब मलिकांचे केले कौतुक !
ठाणे रुग्णालयात 22 रुग्णांचा बळी

12 ऑगस्ट 2024. ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रात्री 12 तासांत 22 रुग्णांचा बळी गेला. या दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. कारण घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील ही दुर्घटना होती. चौकशीसाठी समिती स्थापन झाली. दीड महिना उलटला गेला अजून अहवाल जनतेसमोर आलेला नाही.
नांदेड रुग्णालयात मृत्युचे तांडव, 24 मृत्यू

1 ऑक्टोबर 2023. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी (2 ऑक्टोबर) धक्कादायक वास्तव समोर आले आणि महाराष्ट्र हादरून केला. हे कमी म्हणून की काय दुसऱ्या दिवशी मृतांचा आकडा 31 पर्यंत पोहोचला. गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये 12 बालकांचा समावेश होता.
छ.संभाजीनगरमध्ये 10 रुग्णांचा मृत्यू

2 ऑक्टोबर 2023. नांदेडनंतर छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय रुग्णालयातही (घाटी रुग्णालय) असाच प्रकार घडला. सोमवारी 24 तासांत तिथे 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे भयाण वास्तव समोर आले. या मृतांमध्ये दोन लहानग्यांचा समावेश आहे.
सरकारने नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णांच्या मृत्युची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे. पण नुसत्या चौकशी समिती स्थापन करून काय फायदा होणार? त्यांचा अहवाल स्वीकारला जातो का? अहवाल स्वीकारल्यावर त्यावर कार्यवाही केली जाते का? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. कारण ठाण्याच्या रुग्णालयातील 22 रुग्णांच्या मृत्युचा अहवाल वेळेत आला असता आणि त्या रुग्णाच्या मृत्युची कारणमिमांसा झाली तर कदाचित नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती झाली नसती. पण नुसत्या समित्या स्थापन केल्यामुळे महायुती सरकारच्या काळात ‘उदंड जाहल्या समित्या’, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.