मराठा आरक्षणासाठि उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित आज उपोषण सोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठि उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची गुरुवारी, (14 सप्टेंबर) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे भेट घेतली. मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आजचा सतरावा दिवस होता. ते उपोषण मागे घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण मुख्यमंत्री शिंदे यांचाशी झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी फळाचा रस घेऊन हे उपोषण मागे घेतले.
मराठा अरक्षणाबाबतीत मुख्यमंत्री शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत असतानाच मंत्रिमंडळातील काही मंत्रीही यावेळी उपस्थित होते. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उदय सामंत, गिरीश महाजन, संदीपान भूमारे, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर हे यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित आहेत.
गेल्या सतरा दिवसापासून जरांगे पाटील करत असलेल्या उपोषण मागे घेण्यासाठी हे मंत्री सतत प्रयत्न करत असल्याचे दिसत होते. आता, सरकारच्या प्रयत्नांना यश आले असून शिंदे सरकारकडून आरक्षणाचा तिढा आता सुटेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले, “आतापर्यंत जे कधीच घडलं नाही, ते आज घडलं. राज्यातील ही पहिली घटना आहे म्हणून कौतुक करायला हवे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मराठा आरक्षणाच्या विषयात लक्ष घालून आमरण उपोषण सोडवायला आले. मराठा समाजाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो.”
हे ही वाचा
Ias अधिकाऱ्याने सामान्य जनतेला मिळवून दिले ८३० कोटी
मुख्यमंत्री शिंदे हे आपल्याला न्याय मिळवून देतील असा विश्वास जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. “मराठा आरक्षण हा आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे. 29 तारखेला आपलं आंदोलन सुरु झाल्यापासून मी सांगत होतो की, आपल्याला कुणी न्याय देऊ शकेन तर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवला. आज ते या ठिकाणी येऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणालेत. मला ते आपल्याला न्याय देतील असा विश्वास आहे. फक्त आमच्या समाजाला त्याचा उपयोग होईल असं टिकणारं आरक्षण आम्हाला द्या,” असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.