सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निवडणूकांचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणूका तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय पक्षांमधील इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरू आहे. अशा सर्व वातावरणात रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील पाली सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायतच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष गीता पालरेचा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.
रायगड जिल्ह्यातील पाली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष गीता पालरेचा यांच्यासह 34 ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच,सदस्य यांच्यासह, 3 नगरसेवक,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी सोमवारी (28 नोव्हेंबर) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी यापक्ष प्रवेश कार्यक्रमात भाडपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा
विशेष म्हणजे ऑक्टोबर 2022 ते जिसेंबर 2022 या कालावधीत रायगड जिल्ह्यातील एकुण 240 ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात याठिकाणी निवडणूका लागणार आहेत. यांपैकी 14 ग्रामपंचायती पाली तालुक्यातील आहेत. त्यामुळे या भागात भारतीय जनता पक्षात झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला निवडणूकांमध्ये फायदा होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असणाऱ्.या रायगड जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम केल्यामुळे राष्ट्रवादीचे टेन्शन वाढले असल्याचे दिसून येत आहे.
तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली त्यावेळी रायगड जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे तिन्ही आमदार अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि महाडचे आमदार भरत गोगावले यांनी शिदेंगटात प्रवेश केला. त्यानंतर काही दिवसांनी रायगड जिल्ह्यातील अनेक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला होता. यामुळे शिवसेना आणि मनसेला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का दिल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोर्चा वळवला असल्याच्या चर्चांना उधानं आलं आहे.