30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रमराठी आणि सीमाप्रश्नावर कुणी आम्हाला ज्ञानामृत पाजू नये, संजय राऊतांचा भाजपला खोचक...

मराठी आणि सीमाप्रश्नावर कुणी आम्हाला ज्ञानामृत पाजू नये, संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादा हा खूप जुना वाद आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर शिवसेनेने आंदोलन केले आहे. शिवसेनेने या वादात अनेक हुतात्मे दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या सीमा वादामुळे तुरुंगवास भोगला. त्यामुळे मराठी आणि सीमाप्रश्नावर कुणी आम्हाला ज्ञानामृत पाजू नये, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र एकीकरण समिती गेल्या ६५ वर्षांपासून संघर्ष करत आहे. या संघटनेच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन केले. शुभम शेळके आता तिकडे लोकसभेची निवडणूक लढत आहेत. त्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो. हा निव्वळ दौरा नव्हता. आमचे कितीही मतभेद असले तरी महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी शुभम शेळकेंना पाठिंबा दिला पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही तिकडे गेले होते. शुभम शेळके या निवडणुकीत मुसंडी मारतील याचा आम्हाला विश्वास आहे, असे राऊत म्हणाले.

फक्त भाजपची भूमिका वेगळी

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आता विरोधी पक्षनेते आहेत. बेळगाव, कारवार महाराष्ट्रात येण्यासाठी मुख्यमंत्री असताना फडणवीसांच्या नेतृत्वातच ठराव झाले आहे. एकीकरण समितीचे लोक जेव्हाही त्यांना भेटायचे तेव्हा आम्ही तुमच्या पाठी ठाम उभे आहोत असे ते सांगायचे. तसे वचनच त्यांनी दिले होते. आज एकीकरण समितीला त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. तेव्हा फडणवीसांनी वेगळी भूमिका घेतली आहे. बेळगावात मराठी माणसाच्या विरोधात प्रचार करू नये असे आमचे आवाहन आहे. सर्वांनी ते मानले आहे. फक्त भाजपने वेगळी भूमिका घेतली आहे, महाराष्ट्र त्याची नोंद करून ठेवेल, असे त्यांनी सांगितले.

तुमचं मराठी प्रेम दिसून आले

सीमा लढ्यात ६७ हुतात्मे आम्ही दिले. बाळासाहेब ठाकरेंना तीन वर्षाचा कठोर तुरुंगवास झाला. त्यामुळे सीमावासिय आणि मराठी याबद्दलच प्रेम आम्हाला शिकवण्याची गरज नाही, आम्हाला कुणी ज्ञानामृत पाजू नये. तुमचे मराठी प्रेम दिसून आले आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

मुख्यमंत्र्यांना कठोर पावले उचलायला लावू नका

यावेळी त्यांनी संचारबंदीबाबत भाष्य केले. मुख्यमंत्री फार सौम्य आहेत. ते माणुसकी आणि दया दाखवत आहेत. लोकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री अस्वस्थ आहेत. त्यांनी कठोर पावले उचलली पहिजे, असे सांगतानाच कोरोनाचे नियम पाळा. मुख्यमंत्र्यांना कठोर पावले उचलण्यासाठी प्रवृत्त करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

अजित पवार सर्जन

सरकारला टेकू कसा लावायचा हे अजित पवारांना माहीत आहे. पहाटे शपथ घेऊन दुपारी त्यांनी सरकार स्थापन केले. अजित पवार हे संपूर्ण ऑपरेशनमध्ये सर्जन आहेत, असेही ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी