30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसुरेश जैन यांच्या पंटरांचे जळगावात नसते उद्योग; शहर भकास करणारा म्हणे करेल...

सुरेश जैन यांच्या पंटरांचे जळगावात नसते उद्योग; शहर भकास करणारा म्हणे करेल विकास!

सुरेश जैन हे जळगावात 1980 पासून 8 वेळा, सतत 34 वर्षे आमदार होते. त्या काळात जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील सत्ता पदावर त्यांनीच मांड ठोकली होती. या काळात जळगावात ना उद्योग आले, ना शहर-जिल्ह्याचा काही विकास झाला. आता शहर भकास करणाऱ्या याच सुरेश जैन यांची पंटर मंडळी सोशल माध्यमातून त्यांना विकासपुरुष म्हणून रंगवत मोहीमा चालवत आहेत. जैन यांच्या घरचीच काही माध्यमेही त्यात सामील आहेत.

मुळात तीन वर्षापूर्वीच जैन यांनी राजकारणातून संन्यासाची घोषणा केली आहे. त्याचवेळी त्यांनी यापुढे फक्त सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहण्याचे जाहीर केले होते. तसेही आता त्यांचे वय झालेले आहे. राजकारणातून ते “आऊटडेटेड” झालेले आहेत. याहून महत्त्वाचे म्हणजे, कोट्यवधीच्या घरकुल घोटाळ्यात मुख्य आरोपी म्हणून न्यायालयाने सुरेश जैन यांना सात वर्षांची शिक्षा आणि 100 कोटी रुपये दंड ठोठावला आहे. त्यांना सशर्त जामीन आधी मंजूर होताच, आता तो कायम करताना उच्च न्यायालयाने कुठलीही शर्थ ठेवलेली नाही. म्हणजे ते आता मुंबईबाहेर जाऊ शकतील एव्हढेच!

एखाद्या गंभीर गुन्ह्यात दोषारोप सिद्ध होऊन शिक्षा लागलेला आरोपी जामीनावर बाहेर येत आहे म्हणून त्याला डोक्यावर घेऊन नाचण्याचे खरेतर काही कारण नाही. त्यामुळे कालच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर जळगावात जो काही तमाशा सुरू झालाय, तो उबग आणणारा आहे. कुणी देशासाठी फार मोठी कामगिरी करून जळगावात येत नाही. न्यायालयाने शिक्षा ठोठावलेला एक गुन्हेगार जामीनावर सुटून शहरात येत आहे, याची त्यांच्या समर्थकांनी जाणीव ठेवावी. उगाच मिरवणुका आणि हुल्लडबाजी करून संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचा तमाशा कुणी करू नये. गुन्हेगार स्वागताच्या उन्मादाचा नागरिकांना त्रास होऊ नये. काही एजन्सी अशा आयोजनात आणि सोशल मीडियावरील पेड प्रतिमानिर्मिती कॅम्पेनमध्ये कार्यरत असतात, असा अनुभव आहे. त्यामुळे अशा कुठल्या मोहिमा या संपूर्ण शहराचे मत किंवा जनमानसाचा कल आहे, असे आजिबात नसते.

1,635 दिवस तुरुंगात काढल्यानंतर जामिनावर मुक्त होऊनही गेले 1,186 दिवस सुरेश जैन मुंबईतच आहेत. सहा वर्षांनंतर ते आता आपली मायभूमी, कर्मभूमी जळगावात जातील. उतार वयात त्यांना मिळालेला हा दिलासा स्वागतार्हच आहे. त्यांनी केलेल्या गुन्हा-कर्माची बरीचशी शिक्षाही भोगून झालेली आहे. त्यामुळे त्यांनी आधी घोषणा केल्यानुसार, राजकारणापासून दूर राहण्यातच शहाणपण आहे. त्यांचे उतावीळ समर्थक मात्र त्यांना आता म्हातारपणी पुन्हा राजकारणाच्या बोहल्यावर चढवू पाहत आहेत. गेली 40-50 वर्षे शहरात राजकारण करताना जैन यांनी इतर कुणाला मोठे होऊ न दिल्यानेच आता सक्षम उत्तराधिकारी नसण्याची ही स्थिती ओढविली आहे. तिसऱ्या-चौथ्या फळीत उदंड समर्थक-कार्यकर्त्यांची गर्दी आहे; पण दुसऱ्या फळीतही आज कुणी योग्य, दमदार दावेदार नाही.

हेही वाचा

जळगावत भाजप-सेनेची युती होणार? राजकीय वातावरणात उडाली खळबळ

Ajit Pawar : जळगावच्या सभेत अजित पवारांनी सरकारचे कान उपटले

Lay Bhari : ‘लय भारी’च्या संपादकपदी विक्रांत पाटील यांची नियुक्ती !

सुरेश जैन यांनी केलेला घरकुल घोटाळा हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता. या घोटाळ्यामुळे जळगाव महापालिका कर्जबाजारी झाली, हे न्यायालयानेही मान्य केले. त्यामुळेच सर्व दोषींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली. गरीब, सर्वसामान्यांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न जैन यांनी भंग केले. जिल्ह्यातील सहकार चळवळ त्यांनी संपविली. मराठा व इतर बहुजन समाजातील नेत्यांना संपविले. केवळ व्यापाऱ्यांचे आणि ठेकेदारांचे जैन यांनी भले केले. जळगातील गुंडगिरी संपविण्याचे श्रेय मात्र जैन यांनाच द्यावे लागेल. त्यांनी गुंड टोळ्यांना राजकारणात आणले आणि आज तीच मंडळी ठेकेदारी करून शहराला लुबाडत आहेत. आता अनेक पंटर सवाल करू लागले आहेत, की जैन तुरुंगात गेल्यापासून म्हणजे गेल्या 8 ते 10 वर्षांत शहराचा काय विकास झाला? या मंडळींनी हेही सांगावे, की त्यापूर्वी 30-40 वर्षात सुरेश जैन यांनी शहरात विकासाचे कोणते असे दिवे लावले?

सुरेश जैन यांचा राजकीय प्रवास आणि एकूणच संपूर्ण कारकीर्द काही निश्चित विचारधारेशी निष्ठा राखणारी नाही. त्यांची नेमकी बांधीलकीही सांगता यायची नाही. निष्ठावंत तर त्यांना मुळीच म्हणता येणार नाही. आधी काँग्रेस नंतर समाजवादी काँग्रेस, पुन्हा काँग्रेस, नंतर शिवसेना, पुढे राष्ट्रवादी, पुन्हा शिवसेना, नंतर खान्देश विकास आघाडी असा वारे वाहतील तो पक्ष असा जैन यांचा सत्ताधिष्ठित राजकीय प्रवास आहे. भरपूर कोलांटउड्या, पक्षबदल आणि सतत बदलणाऱ्या भूमिका हे सारे काही शहराच्या हितासाठी नव्हे तर स्वत:चे भले आणि आपल्यासोबतच्या पंटर कंपूची सोय लावण्याचे उद्योग होते. आताही ते नेमक्या कोणत्या शिवसेनेत आहेत, की पुन्हा भाजप किंवा इतर अन्य जागी पक्षांतर करून त्यांना मैदानात उतरवण्याची स्वप्ने पाहिली जात आहेत, हे त्यांच्या पंटर मंडळीनी सांगावे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी