चंद्रपूर मध्ये ओबीसी नेते रवींद्र टोंगे यांचे मागील 21 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आज मागे घेण्यात आले. आंदोलकांनी केलेल्या विविध मागण्यांबाबत आश्वासन मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे उपोषण मागे घेण्यात आले. रवींद्र टोंगे यांनी आज शनिवारी, (30 सप्टेंबर) फडणवीस यांच्या हातून सरबत घेत उपोषण मागे घेतलं. टोंगे यांच्यासह विजय बलकी आणि प्रेमानंद जोगी हेही गेल्या आठ दिवसांपासून उपोषण करीत होते. त्यांनीही फडणवीस यांच्या हातून सरबत घेऊन उपोषण मागे घेतले. यावेळी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावून कोणालाही आरक्षण देणार नाही,’ असे स्पष्ट केले.
मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी कलेलेल्या उपोषणात त्यांनी सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे ही मागणी केली होती. राज्य सरकारनेही ह्या मागणीबाबत जरांगे पाटील यांना आश्वस्त केले होते. त्यानंतर, ओबीसी संघटनांकडून ह्या मागणीचा विरोध करण्यात आला. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश नको या मागणीवरून ओबीसी संघटनांकडून आंदोलन छेडले होते. ह्याच मागणीसाठी रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
🕦10.28am | 30-9-2023 📍 Chandrapur | स. १०.२८ वा. | ३०-९-२०२३ 📍 चंद्रपूर
LIVE | राष्ट्रीय ओबीसी मोर्चा महासंघ अन्नत्याग आंदोलन#OBC #OBCReservation #maharashtra https://t.co/Wxi6X9jPMs
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 30, 2023
काल, शुक्रवारी (29 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ओबीसी शिष्टमंडळाच्या अडीच तास चाललेल्या बैठकीत सकारात्माक चर्चा झाली. त्यानुसार, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन मंत्री सुधीर मुंनगंटीवार आणि ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीत रवींद्र टोंगे यांनी उपोषण सोडत ओबीसी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.
हे ही वाचा
भटक्या विमुक्त तसेच दुर्लक्षीत घटकांना भरघोस निधी देणार : अजित पवार
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही : एकनाथ शिंदे
ओबीसींसाठी 4 हजार कोटींच्या योजना; वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षणाचा निर्णय़ : देवेंद्र फडणवीस
यावेळी उपस्थितांशी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्य सरकार ओबीसींच्या पाठीशी आहे. ओबीसी आरक्षणाला तसूभरही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. ओबीसींच्या कोणत्याही मुद्द्यावर राज्य सरकार नकारात्मक नाही. आम्ही याबाबत सकारात्मक असून ओबीसींना निधी देण्यात आम्ही मागे हटणार नाही.”
“काल मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांसोबत सुमारे अडीच तास चर्चा केली असून प्रश्न निकाली लागले आहेत. अजून प्रश्न असतील तर सरकार त्यावरही चर्चा करायला तयार आहे. ओबीसींचा एकही प्रश्न पेंडींग ठेवणार नाही. ओबीसींच्या हितासाठी जे काम करतात त्यांच्यासोबत चर्चा करण्यास आम्ही कधी तयार आहोत,” असे फडणवीस यांनी सांगितले.