राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी आव्हाड यांच्यावर कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच न्यायालयाने मात्र आव्हाड यांना दिलासा दिला आहे. उद्या मंगळवारी अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत जितेंद्र आव्हाड यांना अटक करु नये असे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले असल्याची माहिती त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड आव्हाड यांनी दिली आहे.
दरम्यान ऋता आव्हाड यांनी मुंब्रा पोलिसांना देखील एक पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, तक्रारदार महिला पोलिस संरक्षणाची मिळण्यासाठी मागणी करु शकते. आव्हाड यांच्या नावे धमकीचा फोन आल्याची तक्रार देखील ती महिला करू शकते. त्यामुळे अशी कोणतीही तक्रार पोलिसांकडे आल्यास त्याची चौकशी करुन कारवाई करावी असे पत्र ऋता आव्हाड यांनी मुंब्रा पोलिसांना दिले आहे.
ऋता आव्हाड यांनी राज्य महिला आयोगाकडे देखील धाव घेतली आहे. त्यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली असून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कलम 354चा खोटा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दबाव तंत्र वापरून दाखल केला असून हा गुन्हा रद्द करुन खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी असा तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या पत्राची दखल महिला आयोगाने घेतली असून महिला आयोगाने ठाणे शहर पोलिस आयुक्तांना यासंदर्भात पत्र लिहीत या प्रकरणी फिर्यादीने दाखल केलेला गुन्हा आणि परस्परविरोधात मिळालेले अर्ज दोन्हींबाबतची सत्यता पडताळून वस्तुस्थिती दर्शक अहवाल राज्य महिला आयोगाकडे सादर करावा, असे या पत्रात म्हटले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.
हे सुद्धा वाचा :
Bhrat Jodo Yatra : मोबाईल ‘मेड इन चीन’ नाही तर ‘मेड इन हिंगोली’ असला पाहिजे!
Eknath Shinde : आव्हाडांनी कायदा हातात घेऊ नये, सुडभावनेतून कोणतीही कारवाई होणार नाही; मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया
ठाण्यातील कळवा पूलाचे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर गर्दीतून बाहेर पडत असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप एका महिलेने केला, तसेच याबाबत पोलिसांत देखील तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.