राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आव्हाड यांनी काल पत्रकार परिषद घेत माझ्याविरोधात कटकारस्थान रचले जात असल्याचा आरोप केला. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी देखील ही कारवाई चुकीची असल्याने गुन्हा मागे घेण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधीपक्ष नेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या, त्यानंतर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील या प्रकरणात जातीने लक्ष घालत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
एबीपी माझा वृत्तवाहिनीने ही दिली आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करुन या प्रकरणावर चर्चा केल्याची माहिती या वृत्तात दिली आहे. शरद पवार मुख्यमंत्र्यांना फोनवर चर्चा करताना म्हणाले की, राजकीय हेतूने अशा कारवाया टाळाव्यात, अशा कारवाया करणे योग्य नाही, त्यामुळे समाजात वेगळा संदेश जातो, त्यामुळे राजकीय हेतू ठेवून अशा कारवाया करणे टाळले पाहिजे असे पवार त्यांना म्हटले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार यांना सांगितले की, ही कारवाई कोणत्याही राजकीय हेतूने करण्यात आलेली नसून एका महिलेच्या तक्रारी नंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादीचे कळवा- मुंब्रा या मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी सध्या वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यात हर हर महादेव चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्या नंतर ठाण्यातील चित्रपटगृहात त्यांनी चित्रपटाचा शो बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तेथे आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना मारहाण केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी आव्हाड यांना जामीन मिळाल्यानंतर ते तुरूंगाबाहेर आले होते.
हे सुद्धा वाचा :
10वी 12वीच्या परिक्षांबाबत मोठा निर्णय; वाचा सविस्तर
त्यापाठोपाठ त्यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. कळवा पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी झाला. यावेळी जितेंद्र आव्हाड देखील तेथे उपस्थित होते. कार्यक्रम तेथे मोठी गर्दी झाली होती. या गर्दीतून जितेंद्र आव्हाड वाट काढत बाहेर येत होते. यावेळी एका महिलेने जितेंद्र आव्हाड यांनी माझा विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केल्यानंतर त्यांच्यावर मुंब्रा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.