काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून ‘जलजीवन मिशन’ कार्यक्रमांतर्गत संगमनेर तालुक्यातील साकुर व मालदाड येथील नळ पाणीपुरवठा योजनांना अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये साकुरसाठी 20 कोटी 39 लाख तर मालदाडसाठी 18 कोटी 71 लाख रुपयांच्या निधी मिळणार असल्याचे इंद्रजीत थोरात यांनी सांगितले आहे. या योजनेसाठी साकुर व मालदाड येथील विविध पदाधिकाऱ्यांनी सातत्याने याबाबतचा पाठपुरावा केल्यामुळे आता लवकरच दोन्ही गावांमधील नागरिकांच्या कुटुंबांना घरापर्यंत नळाद्वारे पाणी मिळणार आहे. नळ पाणीपुरवठा योजनेस मान्यता मिळाल्याने स्थानिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
योजनेस मान्यता मिळाल्याचे सांगताना इंद्रजीत थोरात म्हणाले, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने संगमनेर तालुक्यातील विविध गावांच्या विकासासाठी मोठा निधी मिळवला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये निळवंडे कालव्यांच्या कामाला दिलेली गती व त्यासाठी मिळवलेल्या मोठा निधी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे कालव्यांची कामे ही अंतिम टप्प्यात आली आहेत तसेच विविध रस्ते व पाणीपुरवठा योजनांसाठीही सुमारे 700 कोटींचा निधी मिळवला होता. आता नव्याने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जि.प.सदस्य भाऊसाहेब कुटे व जि.प.सदस्या मीरा शेटे आणि शंकर पा. खेमनर यांच्या पाठपुराव्यातून साकुर व मालदाड गावांसाठी नळ पाणीपुरवठा योजनांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याचे थोरात यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा…
Asia Cup 2022 : ‘या’ दोन खेळाडूंची आशिया कप खेळण्याची संधी हुकणार
Andheri East By Poll Election : मुंबईत होणार शिवसेना वि. शिंदेसेनेचा सामना ?
Sanjay Raut Business Partner Booked : संजय राऊतांना धक्का, सुजित पाटकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
इंद्रजीत थोरात पुढे म्हणाले, यामध्ये साकुर पाणी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 20 कोटी 39 लाख 62 हजार रुपये इतक्या ढोबळ किमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास अटी व शर्तींची पूर्तता करण्यास अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तर मालदाड येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 18 कोटी 71 लाख 98 हजार रुपयांचा अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे या दोन्ही गावांमधील नागरिकांच्या कुटुंबांना घरापर्यंत नळाद्वारे पाणी मिळणार आहे. या योजनेसाठी साकुर व मालदाड च्या विविध पदाधिकाऱ्यांनाही सातत्याने पाठपुरावा केला होता.
या योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी माजी प्रदेशाध्यक्ष व काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, सौ.मीराताई शेटे, शंकर पा.खेमन यांनी सातत्याने पुढाकार घेतल्याने अखेर या योजनेस मान्यता मिळाली आहे, त्यामुळे या दोन्ही गावातील नागरिकांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे.