सातारा जिल्ह्यासाठी मंजूर झालेला ‘बंगळुरू–मुंबई औद्योगिक कॉरिडॉर’ हा प्रकल्प कोणत्या ठिकाण सुरू करायचा यावरून सध्या जोरदार रणकंदन सुरू आहे. हा प्रकल्प म्हसवड येथे सुरू करण्याबाबत ‘महाविकास आघाडी’ सरकारच्या काळात निर्णय झाला होता. त्याबाबतची अधिसूचना सुद्धा जारी झाली होती. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर येताच त्यांनी हा निर्णय फिरवला. सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव परिसरात हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने घेतला. या निर्णयामुळे म्हसवड परिसरातील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्या, रविवारी सकाळी नऊ वाजता मुंबईत एका बैठकीचे आयोजन केले आहे.
‘बंगळुरू–मुंबई औद्योगिक कॉरिडॉर’ हा हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. जवळपास ८ हजार एकर जमिनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. म्हसवड परिसरात त्यासाठी सरकारी जमीन उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनीही खासगी जमिनी दिल्या आहेत. याशिवाय लगतच्या गारवाड, माळशिरस परिसरातील जनतेनेसुद्धा हा प्रकल्पाची मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी स्थलांतरीत केलेल्या उत्तर कोरेगाव परिसरातील गावकऱ्यांचा या प्रकल्पासाठी विरोध आहे. तेथील चार गावांतील ग्रामपंचायतींनी ठराव करून या प्रकल्पाला विरोध केला आहे. या गावांमधील जमिनी सुपीक आहेत. तिथे बागायती पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. त्यामुळे या जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी दिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईल. या रास्त भितीमुळे शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध केला आहे.
शेतकऱ्यांचा हा विरोध लक्षात न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ राजकीय हेतू मनात ठेवून हा उत्तर कोरेगावच्या शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला मात्र म्हसवड – गारवाड येथील शेतकरी या प्रकल्पाची मागणी करीत आहेत, तिथे हा प्रकल्प उभा करण्यास शिंदे यांनी अडथळा आणला आहे.म्हसवड येथील जमीन प्रकल्पासाठी योग्य नाही, असे एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारबरोबरच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सांगितले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यासोबत ७ जुलै रोजी ऑनलाईन पद्धतीने ही बैठक झाली होती.
हे सुद्धा वाचा
Modi government : मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी शरद पवार, नितीश कुमार नवीन व्युहरचना आखणार
Cocaine : बापरे ! त्याने तब्बल 87 कोकेनच्या गोळया पोटात लपवल्या, कस्टमने घेतली झडती
Ashok Chavan : अशोक चव्हाण – देवेंद्र फडणवीस भेट, अन् इन्कम टॅक्सची धाड !
तत्कालिन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या चुकीच्या अहवालाच्या आधारे शिंदे यांनी केंद्र सरकारला ही चुकीची माहिती दिली होती. त्यामुळे उत्तर कोरेगाव येथे प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.त्यानंतर म्हसवड – गारवाड परिसरातील कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे, तसेच केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना उद्याच्या भेटीची वेळ दिली आहे. म्हसवड येथे औद्योगिक कॉरिडॉर उभारण्याबाबतचा मूळ निर्णय शरद पवार यांचाच होता. निवृत्त IAS अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे शरद पवार यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी केलेली चूक शरद पवार सुधारण्यासाठी ठोस पाऊले उचलतील अशी आशा या कार्यकर्त्यांना आहे.