गणपती हे विद्येचे दैवत आहे. तसेच ते भक्तांचे संकट हरण करून त्यांना सुख देते. त्यामुळेच गणपतीला ‘विघ्नेश्वर’ हे नाव आहे. भक्तांची संकटे दूर करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारे गणपती बाप्पा सर्वांना वंदनीय आहेत. अशा विघ्न हरण करणाऱ्या गणपतींची आठ मंदिरे अष्टविनायक या नावाने प्रसिद्ध आहेत. अष्टविनायकांपैकी पाचवा गणपती म्हणजे ओझरचा ‘विघ्नेश्वर’ होय. हे स्थान कुकडी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. हा गणपती अष्टविनायकांपैकी सर्वांत श्रीमंती गणपती आहे. या गणपतीची मूर्ती लांब रुंद आहे. गणपतीच्या डोळयात माणिक रत्न असून, कपाळावर हिरा आहे. या गणपतीच्या चेहऱ्यावर तेज असून, मुर्ती प्रसन्न चित्त आहे. हा गणपती सर्व विघ्नांचे हरण करतो, म्हणून त्याला ‘विघ्नेश्वर’ गणपती या नावाने ओळखतात.
ही मूर्ती स्वयंभू आहे. या मंदिराच्या चारही बाजूंनी तटबंदी असून, मध्यभागी गणपतीचे मंदिर आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी १७८५ मध्ये या मंदिराचा जीणोद्धार केला. या मंदिरावर सोनेरी कळस चढवला. या ठिकाणाहून जवळच खोडदा येथे आशिया खंडातील सर्वांत मोठी इलेक्ट्रीक दुर्बिण आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला देखील येथून जवळ आहे.
हे सुद्धा वाचा
Ashtavinayaka Darshan : अष्टविनायक दर्शन- तिसरा गणपती भीमेच्या तिरावरचा ‘सिद्धटेकचा’ सिद्धिविनायक
Ashtavinayak Darshan : दुसरा गणपती – भक्तांची चिंताहरण करणारा थेऊरचा ‘चिंतामणी’
Ashtavinayak Darshan : अष्टविनायक दर्शन- चौथा गणपती’ रांजणगाव’चा महागणपती
राजा अभिनंदनने मोठा यज्ञ केला होता. त्याला त्रैलोकावर राज्य मिळवायचे होते. त्यामुळे देवांचा राजा इंद्र यांना भीती वाटू लागली. इंद्रदेवाने यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली. तो राक्षस उन्मत्त झाला. त्याने सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरूवात केली. तो ऋषीमुनींना त्रास देऊ लागला. त्यामुळे त्याला मारण्यासाठी ऋषींनी गणपतीची आराधना केली. विघ्नासुराचे गणपतीबरोबर युद्ध झाले. गणपतीने त्याचा पराभव केला. त्यामुळे विघ्नहर राक्षस गणपतीला शरण गेला.
गणपतीने त्याला माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की, तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव तुमच्या भक्तांनी घ्यावे, तसेच तुम्ही याच ठिकाणी रहावे. त्यावेळपासून गणपती या ठिकाणी राहू लागले. त्यानंतर सर्व राक्षसांनी मिळून एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधले. भाद्रपद गणेश चतुर्थीला चार दिवस या ठिकाणी मोठी यात्रा भरते. दर महिन्यातील चतुर्थीला देखील या ठिकाणी भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.