महाविकास आघाडी सरकारची सत्ता उलथून टाकत शिंदे – फडणवीस यांनी राज्यात नवी सत्ता स्थापन केली. महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला तरी अजूनही मंत्रिमंडळाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. खोळंबलेल्या या निर्णयाचा मुद्दा विरोधकांनी वारंवार उपस्थित करून सुद्धा शिंदे – फडणवीसांचे असलेले दोन डोक्यांचे सरकार अद्याप या निर्णयाबाबत कोणतीच हालचाल करत नसल्याचे दिसून येत आहे. यावरून राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी यावरून टिका केली आहे. यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारासाठी कामाख्या देवीला 40 रेड्याच्या बळीची अपेक्षा असल्याचे म्हणत त्यांनी मिश्किल टोला लगावला आहे. वादग्रस्त ठरलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याने यावर कधी निर्णय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सूरज चव्हाण यांनी मंत्रिमंडळाबाबत सत्ताधाऱ्यांना टोला लगावत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सूरज चव्हाण ट्विटमध्ये लिहितात, शिंदे फडणवीस यांना 8 वेळा दिल्ली वारी करूनही मंत्रिमंडळ विस्तारासाठी यश भेटत नाही यावरून मला वाटतंय कामाख्या देवीला 40 रेड्याच्या बळीची अपेक्षा आहे असे म्हणून सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
शिंदे फडणवीस यांना 8 वेळा दिल्ली वारी करूनही मंत्रिमंडळ विस्तारासाठी यश भेटत नाही यावरून मला वाटतंय कामाख्या देवीला 40 रेड्याच्या बळीची अपेक्षा आहे.
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) August 4, 2022
हे सुद्धा वाचा
Azadi Ka Amrit Mahotsav : भारताच्या स्वातंत्र्यदिनाची तारीख 15 ऑगस्ट ठरवण्याचे कारण
Cabinet Expansion : उतावळ्या बंडखोरांना लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार सोसवेना !
Tricolor : तिरंग्याच्या आडून गटार लपविले, भाजप सरकारचा अजब कारभार
शिंदे – फडणवीसांची सत्ता दररोज नव्या मुद्यांवरून वादग्रस्त ठरत आहे. त्यामध्ये मंत्रिमंडळाच्या मुद्यावरून राजकीय पटलावर वादंग पाहायला मिळत आहे. हा विषय निकालात काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारख्या दिल्लीवाऱ्या करत आहेत, परंतु वरिष्ठांकडून अजूनही हिरवा कंदिल मिळत नाही, त्यामुळे त्यांची सुद्धा घालमेल वाढल्याचे दिसत आहेत. दरम्यान कोणाला मंत्रिपद मिळणार हे अजूनही स्पष्ट न झाल्याने आपले स्थान कायम राहावे यासाठी शिंदे गटातील आणि भाजपच्या गटातील नेत्यांची चढाओढ सुरू आहे.
अनेक नेत्यांनी सरळ दिल्ली गाठत मंत्रिमंडळातील वर्णीबाबत दिल्लीदरबारी जाणे सुरू केले आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ, त्यातील वर्णी याबाबत नेमकं काय घडणार हे पाहणेच आता महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केलेले सूचक वाक्य सुद्धा चर्चेचा विषय ठरत असून मंत्रिमंडळाबाबतच्या निर्णयावर आता पुन्हा विरोधक आणि सत्ताधाऱ्यामध्ये जोरदार खलबतं सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.