काही वर्षापूर्वी गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगले… असा मराठी चित्रपट आला होता. असेच काहीसे म्हणण्याची वेळ आता शहापूरच्या साने- पाली ग्राम पंचायतवर आली आहे. पण ही वेळ आणून ठेवलीय ती शौचालयाने !
ग्राम पंचायत म्हणजे गाव-खेड्यातील नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयच असते. गावातील प्रत्येक प्रॉब्लेमचे उत्तर ग्राम पंचायतमध्ये आल्यावर मिळते, त्यामुळे ग्राम पंचायतमध्ये ग्रामस्थांसह ग्राम पंचायत सदस्यांचा वावर जास्त असतो. शहापूरमधील साने-पाली ग्रुप ग्राम पंचायत कार्यालयात महिलांसाठी शौचालय नसल्याने महिलांची चांगलीच कोंडी हॊत आहे. त्यामुळेच की काय, उपसरपंच सुनीता पाटील यांनी तातडीने ग्रामपंचायत कार्यालयात शौचालय सुरू करण्यासाठी थेट ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांच्याकडे साकडे घातले आहे.
एकीकडे सरकारकडून घरोघरी शौचालय बांधण्यासाठी निधी दिला जातो, असे असतानाच, या ग्राम पंचायतीत महिलांसाठी शौचालय नसल्याने ग्रामस्थ मंडळींमध्ये नाराजीचा सूर आहे. आठ महिन्यापूर्वी या ग्राम पंचायतीत नवीन समितीची निवड झाली होती. या प्रॉब्लेमबाबत सरपंच आणि ग्रामसेवक यांना वारंवार महिती दिली. पण त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे ग्राम पंचायत कार्यालयात येणाऱ्या महिला सदस्यांची मोठी अडचण होत आहे. म्हणूनच की काय या संदर्भात त्वरित कार्यवाईची मागणी उपसरपंच पाटील यांनी केली आहे.
शहापूर हा एकीकडे आदिवासीबहूल तालुका म्हणून ओळखला जातो. पण हा तालुका धरणांचे गाव म्हणूनही ओळखला जातो.
मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांची पाण्याची तहान भागविणाऱ्या या तालुक्यात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असते. शेकडो गाव-पाड्यात पाण्यासाठी मैलोन मैल पायपिट सुरू आहे. कुपोषणाच्या राक्षसाने अनेक बालके गिळली आहेत. हे दृष्टचक्र अजूनही सुरू आहे. असे असताना हे प्रॉब्लेम मांडणाऱ्या ग्राम पंचायतच्या महिला सदस्यांसाठी प्रसाधनगृह नाही ही मोठीच अडचण आहे.